‘अभय योजना'तून हजारो घरांमध्ये परतला प्रकाश

डोंबिवलीः थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत केलेल्या ग्राहकांसाठी ‘महावितरण'ने आणलेल्या ‘अभय योजना'चा लाभ घेणाऱ्या कल्याण आणि भांडुप परिमंडलातील ७,८९१ ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळाली आहे. या दोन्ही परिमंडलातील १३,८४८ ग्राहकांनी योजनेत सहभाग घेत ३० कोटी ६२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला. त्यांना थकीत रवकमेवर विलंब आकार आणि व्याजमाफीसह मुळ थकबाकीत ५ ते १० टक्क्यांची सवलत मिळाली. येत्या मार्च अखेरला योजनेची मुदत संपत असून लाभापासून वंचित दोन्ही परिमंडलातील उर्वारित ग्राहकांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करून संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.  

अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत झालेले लघुदाब आणि उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा, कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. मूळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे तत्काळ पुनःर्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी मिळेल. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss  या पोर्टलवर केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

कल्याण परिमंडलातील ९,५७८ ग्राहकांनी ‘अभय योजना' सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील ८,३९४ ग्राहकांनी आत्तापर्यंत १५ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा केला असून त्यातील मागणी करणाऱ्या ५,२५० जणांना पुनःर्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तर भांडुप परिमंडलातील ५,९७० ग्राहकांनी ‘अभय योजना'मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील ५,४५४ ग्राहकांनी आत्तापर्यंत १५ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी २,६४१ जणांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुनःर्जोडणी किंवा नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सहकार भारती मार्फत नेरूळ येथे कायदेशीर मार्गदर्शन सत्राचे आयोजन