रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा - ना. एकनाथ शिंदे
ठाणे : मी नेहमीच ‘जनसामान्यांची सेवा हाच धर्म' असे मानून काम करीत आलो आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना' राज्यात ७०० पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे. महिलांचे कुटुंबाच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष असते; परंतु स्वतःच्या आरोग्याकडे काहीही लक्ष नसते. शासन सर्वसामान्यांचे असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' आणि ‘जनसामान्यांची सेवा हाच धर्म' या तत्वांवर चालणारे असून मी नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहीन, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग वतीने ६ डे-केअर किमोथेरपी सेंटर (ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वर्धा) उभारण्यात येणार असल्याची घोषणा तसेच कर्करोग मोबाईल व्हॅन-८, १०२ रुग्णवाहिका-३८४, सीटी स्कॅन-२, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका-७, डिजीटल हँड हेड एक्स-रे मशीन-८०चा लोकार्पण सोहळा जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे ९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. दरम्यान, लोकार्पण केलेल्या मोबाईल आरोग्य तपासणी यामुळे प्रत्येक गावागावातील महिलांची आरोग्य तपासणी करणे सहज साध्य होणार आहे. कॅन्सर संपविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे ना. एकनाथ शिंदे म्हणाले.
याप्रसंगी ‘आयुष मंत्रालय, स्वास्थ्य-परिवार कल्याण मंत्रालय'चे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वित्त-नियोजन, कृषी, मदत-पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, नगरविकास विभागचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक अमगोथू श्रीरंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ‘राष्ट्रीय नागरी अभियान'चे संचालक डॉ. स्वप्नील लाळे, माजी खासदार गोविंदा, माजी मंत्री विजय शिवतारे आदि उपस्थित होते.
माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष'च्या माध्यमातून जवळपास ५१ हजार रुग्णांचे प्राण वाचवू शकलो. तब्बल ४६० कोटी रुपयांचे सहाय्य आपण गरजू रुग्णांना करु शकलो, यापेक्षा मोठे समाधान नाही. महायुती सरकार सर्वसामान्यांचे आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडविणे, हेच या शासनाचे ध्येय आहे. समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरु केल्या, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. सर्वसामान्यांचे शासन असेच जोमाने काम करीत राहील असे सांगत लवकरच ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास २ कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प केला आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत आधी दीड लाखापर्यंतची मदत केली जात होती. परंतु, आता या शासनाने सरसकट सर्वांसाठी त्याची मर्यादा ५ लाखापर्यंत केली आहे. दुर्गम भागातील जनतेसाठीही शासन तत्परतेने काम करण्यास कटीबध्द आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच कॅन्सर, टी.बी., हृदयरोग अशा आजारांचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी व्यवस्थेची महत्त्वाची दोन चाके आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगली कामे केली म्हणूनच शासन लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबवू शकले. त्यापैकीच एक ‘शासन आपल्या दारी' उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. संपूर्ण राज्यात ५ कोटी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले. आमचे शासन गतिमान आणि लोकाभिमुख आहे आणि यापुढेही शासन अशाच प्रकारे काम करेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे शेवटी म्हणाले.
आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांनी आपल्या मनोगतात उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की,
राजकारणी सर्वसामान्यांसाठी काम करणारे असावेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहिल्यावर याची खात्री पटते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आजपासून राज्यातील २ कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या निदान-उपचार करण्यात येणार आहेत. सदर उपक्रम महाराष्ट्रातील तमाम मायमाऊलींसाठी समर्पित आहे, अशा शब्दात ना. प्रकाश आबिटकर यांनी आपल्या भावना व्यवत केल्या.
दरम्यान, आयुर्वेदाचे महत्व प्रत्येक भारतीयाला कळण्यासाठी ‘हर घर आयुर्वेद' या उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
‘मायका ॲप'चे लोकार्पण...
सुदृढ मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करणाऱ्या जिल्हा परिषदच्या ‘मायका ॲप'चे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या ‘ॲप'चा लाभ सर्व वयोगटातील नागरिकांना होवू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरुन सदर ॲप डाऊनलोड करता येवू शकते, अशी माहिती सीईओ रोहन घुगे यांनी दिली.
सदर कार्यक्रमात राज्यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्करोगतज्ञ डॉक्टरांचा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या डॉक्टरांचा, दंतचिकित्सक तज्ञ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र फुड बास्केटचे वितरण क्षयरोग रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका मृण्मयी भजक यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी केले. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.