खारघर येथे वैदर्भियांचे स्नेहसंमेलन संपन्न

नवी मुंबई : मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या वैदर्भियांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत आपली मायभूमी ‘विदर्भ'च्या संपर्कात (कनेक्ट) राहून ‘विदर्भ'च्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन बांधकाम व्यावयासिक तथा माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले.

नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वैदर्भियांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ‘आपला विदर्भ सामाजिक-सांस्कृतिक संस्था'तर्फे २ फेब्रुवारी रोजी वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीत आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश हावरे बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यावेळीी ‘आपला विदर्भ'चे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार, कोषाध्यक्ष अनंत शिंदे, सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष अश्विनी हडपे यांच्यासह मोठ्या संख्येने वैदर्भीय उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनात ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपराः माय धुरपता' असा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो वर्षांच्या संबंधांमागील लोकपरंपरा उलगडणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भागवत यांनी गोंड राजांनी मराठी भाषेच्या प्रचारात आणि लोककल्याण क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.

कोकणातील प्रत्येक गावाची एक संघटना अथवा मंडळे असून मुंबईत राहूनही ते गावच्या विकासात योगदान देतात. या गावाच्या मंडळांनी चाळीत अथवा सोसायट्यांमध्ये गावाच्या मालकीची एक खोली घेतलेली असते. या खोलीत गावाकडून नोकरीसाठी येणाऱ्याा तरुणांची काही महिने राहण्याची सोय होते. कोकणी माणूस आधी मनिऑर्डरने आणि आता ‘जी-पे'ने पैसे पाठवतो. मात्र, या उलट ‘विदर्भ'चा माणूम मुंबईत आला की ‘विदर्भ'शी कनेक्ट राहत नाही. तो आधीही मनिऑर्डरने पैसे पाठवत नव्हता आणि आताही ‘जी-पे'ने पैसे पाठवत नाही. सदरचे चित्र बदलायला हवे. आपण ‘विदर्भ'च्या विकासासाठी मुंबईत राहून योगदान द्यायला हवे, अशी भूमिका डॉ. सुरेश हावरे यांनी मांडली. त्यासाठी ‘आपला विदर्भने एखादा ॲप विकसित करुन सदस्य नोंदणी, नोकरी शोधणे, विवाहासाठी स्थळ शोधणे या सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात, अशी सूचना हावरे यांनी केली.

आयआयटी खरगपूर येथे मी एम.टेक. करायला गेलो, तेव्हा तेथील वसतीगृहासमोर एक फलक लागले होते. त्यावर लिहिले होते -टू द होम अवे फ्रॉम होम. आपला विदर्भ संस्था ‘विदर्भ'पासून दूर राहणाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहूनही हक्काचे कुटुंब म्हणून कार्य करीत आहे. सदरची चांगली संकल्पना असून अधिकाधिक वैदर्भियांपर्यंत पोहोचायला हवी. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीही संस्थेने काम करावे, असे चंद्रकांत डांगे म्हणाले.

दरम्यान, सदर कार्यक्रमात एलअँड टी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदी पदोन्नती प्राप्त केलेले रमेश हडपे, ‘सिडको'मध्ये कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती झालेले प्रकाश रोडे, सहा. कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती झालेले अनुज हिवरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १० वीच्या परीक्षेतील विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुंजन चुंचूवार आणि अनिका कठाणे या विद्यार्थिनींचा तसेच सौ. वृंदा ढेंगळे यांचा इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी महिलांचा हळदी-कुंकू आणि बाळगोपाळांची लूट पार पडली. शांभवी गतफाणे या बालगायिकेने गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत डॉ. राणे पॅनेल विजयी