एपीएमसी बाजारात कांद्याची आवक वाढली तरी भाव चढ्याच दरावर स्थिर
वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केट मध्ये सध्या नवीन कांद्याची आवक वाढली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मध्ये दररोज ९० ते १०० नवीन कांद्याच्या गाड्या दाखल होत आहेत. परंतु, अवकाळी पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला असून, अवकाळी पावसामुळे एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मध्ये खराब कांदा दाखल होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर खाली येतील अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मध्ये दर्जात्मक कांदा दाखल होत नसल्याने कांद्याचे दर अजूनही चढेच असून, प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी कांदा विकला जात आहे, असे मत एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन कांद्याच्या ऐन हंगामात अवकाळी पाऊस पडल्याने तोडणीला आलेले कांदा उत्पादन खराब झाले आहे. कांद्याला दुप्पट पाण्याचा मारा झाला असून, त्यामुळे कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मध्ये दररोज ९० ते १०० गाडी कांदा आवक होत आहे. मात्र, यामध्ये आतून ओलसर झालेला कांदा सर्वाधिक दाखल होत आहे. ओलसर कांदा केवळ एकच दिवस टिकेल असा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या मालाला जास्त मागणी आहे. बाजारात कांदा आवक वाढली तरी कांद्याचा दर चढेच आहेत. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान नवीन कांद्याच्या हंगामाने कांद्याच्या दरात घसरण होते. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान एपीएमसी बाजारात प्रतिकिलो कांद्याचे दर १० रुपयांच्या खाली असतात. परंतु, यंदा २०-३० रुपयांवर कांदा दर स्थिर आहेत.