शहरातील कारंजे पाण्यासाठी आसुसलेत ?
वाशी ः स्वच्छ भारत २०२१-२२ अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्च करुन नवी मुंबई शहरातील चौका- चौकात पाण्याचे कारंजे बसवले आहेत. मात्र, यापैकी मोठे कारंजे वगळता इतर कारंजे आजही पाण्यासाठी आसुसलेले असल्याने सदर कारंजे बंद आहेत. त्यामुळे बंद असलेल्या कारंजावर महापालिकेने खर्च कशासाठी केला होता?, असा प्रश्न आता नवी मुंबई शहरातील नागरीक उपस्थित करत आहेत.
उद्यानांचे शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख निर्माण झाली आहे. त्यात आता आकर्षक कारंजांची भर पडल्याने कारंजांचे शहर अशी नवी मुंबई शहराची ओळख तयार झाली होती. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ अंतर्गत नवी मुंबई शहरातील लहान-मोठ्या चौका-चौकात आकर्षक कारंजे बसवले आहेत. या कारंजांना प्रकिया युक्त पाण्याने फुलवले होते. मात्र, स्वच्छ भारत अभियान सरताच या कारंजांकडे महापालिकेने पुरते दुर्लक्ष केल्याने नवी मुंबई शहरात बऱ्याच ठिकाणी आज कारंजे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिकेने करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत कारंजांवर केलेला खर्च वाया घालवला आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.