अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी

उरण : राज्य सरकारने मॉल्समध्ये, किराणा दुकानात मद्य विक्री करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.राज्याची बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने किराणा दुकानांना मद्य विक्री करण्याची परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आणि दात कोरून पोट भरणारा आहे. वाईन म्हणजे दारू नव्हे असल्या तकलादू समर्थनाने तो अधिकच हास्यास्पद झाला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निर्णयच घ्यायचा तर तो कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करून आणि शेतमालाला रास्त हमीभाव देऊन जास्त फायदा होईल की असल्या साफ चुकीच्या उपायांनी ? 

मुळातच नवऱ्याच्या दारू पिण्याने आजवर लाखो महिलांचे आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यात कोरोना काळात तर सुरुवातीला दारू मिळत नव्हती म्हणून आणि नंतर मिळायला लागल्यावर या दोन्ही परिस्थितीत महिलांच्या त्रासाला पारावार उरला नाही. आता किराण्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंत दारूचा समावेश झाल्याने, केवळ दारू पिऊनच नव्हे तर ती आणण्यासाठी देखील महिलांवर दबाव येणार. अपुऱ्या कमाईत जेमतेम संसाराचा गाडा ओढताना त्यात नवऱ्याचे व्यसन त्या कसे सांभाळणार ?

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने या निर्णयाला तीव्र विरोध केला असून असले जीवघेणे उपाय करण्यापेक्षा महसूल वाढवण्यासाठी श्रीमंतांवर कर वाढवण्याचे ठोस उपाय उचलावेत, आणि मॉल्स मध्ये मद्यविक्रीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. अशी माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे नसीमा शेख – राज्य अध्यक्ष,प्राची हातिवलेकर- राज्य सचिव, हेमलता पाटील- राज्य उपाध्यक्ष,अमिता ठाकूर-सेक्रेटरी रायगड जिल्हा, उषा म्हात्रे -रायगड जिल्हा सह सेक्रेटरी यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांच्या वेतन, भत्त्यांमध्ये वाढ करण्याची उत्तर रायगड जिल्हा भाजपची मागणी