स्मशानभूमींच्या रखडलेल्या कामावरुन संताप

कल्याण : कल्याण मधील बैलबाजार आणि लाल चौकी येथील स्मशानभूमींच्या पुनर्बाधणीचे काम गेल्या वर्षभरापासून रेंगाळल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर प्रश्नावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, निष्काळजी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी ‘मनसे'चे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बैलबाजार स्मशानभूमीच्या कामासाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी निविदा काढण्यात आली होती. कंत्राटानुसार सदर काम ३०० दिवसांत पूर्ण होणे बंधनकारक होते. मात्र, फेब्रुवारी २०२६ उजाडले तरी नवीन स्ट्रक्चरचे काम सुरु झालेले नाही. ठेकेदाराने केवळ जुने बांधकाम पाडून ठेवले असून, नवीन आराखड्याप्रमाणे कामाची एक वीटही रचली गेलेली नाही. यामुळे पावसाळ्यात आणि गर्दीच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई आणि डोंबिवलीच्या धर्तीवर या नवीन स्मशानभूमींमध्ये प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एक्झॉस्ट फॅन' आणि धूर उंचावर सोडण्याची आधुनिक यंत्रणा असणे अपेक्षित होते. मात्र, या कामाच्या मूळ टेंडरमध्ये अशा कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसल्याने ‘मनसे'ने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आधुनिक सुविधेअभावी आजुबाजुच्या रहिवासी वस्तीला धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

याला सर्वस्वी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहे. त्यामुळे दोन्ही स्मशानभूमीची मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याने संबंधित ठेकेदारास काळे यादीत टाकण्यात यावे. तसेच संबंधित अधिकाऱ्याने ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण न करुन घेतल्याने संबंधित अधिकाऱ्याला देखील निलंबित करण्यात यावे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा कपिल पाटील यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

योगिधाम परिसरातील उच्चदाब विद्युत वाहिन्या बनल्या धोकादायक