न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजना एप्रिल-२०२५ पर्यंत पूर्ण
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणारी न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजना एप्रिल-२०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर पनवेल महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना विशेषतः महिलांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर होणार असून, महिलांना मोठाच दिलासा मिळणार आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी १० फेब्रुवारी रोजी घेतला. पाणी पुरवठ्यामध्ये घे येणाऱ्या तुटीची भरपाई करुन नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सूचित केले.
पनवेल महापालिका सभागृहात झालेल्या या बैठकीला पनवेल प्रांताधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'चे उपअभियंता रमेश वायदंडे, वेगुर्लेकर, ‘एमएसआरडीसी'चे अधिकारी करंजकर, महापालिका उपायुक्त गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पनवेल शहर वरिष्ठ निरीक्षक पोलीस नितीन ठाकरे, खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे आदी उपस्थित होते.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सूक्ष्म स्तरावर पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांबाबत या वेळी समाधान व्यक्त करण्यात आले. योजनेच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.या योजनेचे काम एप्रिल-२०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांचा समन्वय सुनिश्चित करण्यात आला. योजनेच्या वेळेत अंमलबजावणीसाठी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांनी पूर्ण बांधिलकी दर्शवली.