छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
पर्यावरण दिनी नवी मुंबईत लोकसहभागातून वृक्षारोपण
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिन'चे औचित्य साधून सर्वच विभागांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यासोबतच स्वच्छता मोहिमांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमांमध्ये मोठया प्रमाणात नागरिक, त्यातही विशेषत्वाने महिला आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांचाही या मोहिमांमध्ये लक्षणीय सहभाग होता.
नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाच्या वतीने नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडेल अशा कांचन, चिंच, मोहगना पारिजात, सिताफळ, जांभूळ, निंब, आंबा, बांबू या देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने यावर्षी करावयाच्या वृक्षारोपणाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या ३५ हजारहुन अधिक देशी वृक्षरोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पर्यावरण दिनी लोकसहभागातून आठही विभाग क्षेत्रात वृक्षारोपण मोहिमा हाती घेण्यात आल्या.
तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळ वृक्षसंपदेने हरीत असावे या संकल्पनेतून येथे देशी वृक्षारोपण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांच्यासह उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे,तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त भरत धांडे, कार्यकारी अभियंता राजेश पवार तसेच ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ, उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, ‘ठाणे-बेलापूर औद्योगिक संघटना'चे महाव्यवस्थापक मंगेश ब्रह्मे आणि इतर उपस्थितांच्या शुभहस्ते सदर ठिकाणी मोठ्या संख्येने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा अभियान'ची पर्यावरण संरक्षण-संवर्धन शपथ ग्रहण केली.
बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील तलया येथील कांदळवन भागात महापालिका, हेंकेल ग्रुप आणि महाविद्यालयीन एनएसएसचे विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत सहभागी होत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे महत्व विषद केले. या मोहिमेत सहभागी स्वयंसेवकांनी कांदळवन क्षेत्रातील साधारणतः १०० किलो प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा केला.
नेरुळ पोलीस स्टेशन समोरील जागेत लोकसहभागातून देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये विशेषत्वाने १५० बांबुची रोपे लावण्यात आली. याप्रसंगी नेरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्यासमवेत पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांनी सहभागी होत वृक्षारोपण केले.
नेरुळ विभागातच सारसोळे जेट्टी येथे कांदळवन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत एस. के. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स-नेरुळ आणि एसआयईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या एनएसएस युनिटचे विद्यार्थी स्वयंसेवक आणि स्वच्छता दूत यांनी परिसरातील प्लास्टिक आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले तत्सम साहित्य गोळा केले. त्याचप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबई या आकर्षण केंद्रस्थळी एमजीएम विधी कॉलेजच्या प्राचार्य, प्राध्यापक तसेच वृक्षप्रेमी विद्यार्थी यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करण्यात आले.
वाशी, सेवटर-१० येथील स्व.मीनाताई ठाकरे उद्यान, मिनी सी शोअर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मधील एनसीसीचे विद्यार्थी आणि एनएसएसचे विद्यार्थी तसेच वाशी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तुर्भे विभागांतर्गत सानपाडा क्षेत्रातील सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ-सानपाडा तसेच बंटस् कॉलेजचे विद्यार्थी यांच्या एकत्रित सहयोगातून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी एशियन पेंटस् यांच्या वतीने स्वच्छता दूत यांना गोलाकार गावस्कर कॅपचे वाटप करण्यात आले. सिताराम मास्तर उद्यानाप्रमाणेच सानपाडा येथील संवेदना उद्यान याठिकाणीही नागरिकांच्या सहभागातून देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील निसर्गोद्यानात २०० हून अधिक आम्र वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणाप्रसंगी पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घणसोली, सेक्टर-३ येथील सेंट्रल पार्क तसेच पामबीच रोड सेवटर-१ लगत देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ऐरोली विभाग कार्यालय परिसरात कडूनिंबांची झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे ऐरोली, सेवटर-८ येथील रामदास बापु पाटील उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघटना, ब्रम्हकुमारी संस्था यांच्या सहयोगाने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ऐरोली, सेक्टर -१४ येथील नमुंमपा शाळा मैदानात शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक पर्यावरणप्रेमी आणि सखी महिला यांच्या सहयोगाने कडुनिंबाची ५० वृक्षरोपे लावण्यात आली. पटनी रोड येथेही नेवा गार्डन सोसायटीपासून दिघाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला १०० नग कडूनिंबच्या झाडांचे रोपण करण्यात आले.
दिघा विभागात तलावानजिकच्या साने गुरुजी उद्यानात परिमंडळ-२ चे उपायुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत देशी वृक्षरोपांचे रोपण करण्यात आले.
दरम्यान, वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांना वृक्षरोपे आणि आवश्यकता असल्यास वृक्षरोपे लावण्यासाठी जागा नमुंमपा उद्याान विभागाच्या वतीने उपलब्ध करुन दिली जातील, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून १६० हून अधिक नागरिक आणि संस्थांनी १२,०००हून अधिक देशी वृक्षरोपे महापालिकेकडून प्राप्त करुन घेतली. त्याचेही स्वतंत्र कार्यक्रम त्या त्या व्यक्ती आणि संस्थांमार्फत घेण्यात आले. यापुढील पावसाळी कालावधीत ज्या नागरिकांना तसेच संस्थांना लागवडीसाठी वृक्षरोपांची आवश्यकता असेल त्यांनी सहाय्यक आयुवत (उद्यान) ऋतुजा गवळी-७९७७६३००६३ आी उदयान अधीक्षक प्रकाश गिरी-९३२२९१२८०१ यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.