विद्यापीठ उपकेंद्र की निवडणूक कार्यालय?

 कल्याण : ‘मुंबई विद्यापीठ'च्या कल्याण मधील उपकेंद्रात केवळ ११ विद्यार्थीच शिकत असून याठिकाणी पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू करावा अन्यथा ‘मुंबई विद्यापीठ'च्या या उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा ‘मनसे'च्या वतीने देण्यात आला आहे. सदरचे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय? असा सवाल देखील ‘मनसे'ने केला आहे.
माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने या ‘मुंबई विद्यापीठ'च्या सदर उपकेंद्राला भेट देत उपकेंद्राचा आढावा घेतला.

उच्च शिक्षणासाठी ‘कल्याण'सह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते. यासाठी तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांनी मोठा संघर्ष करून कल्याण मध्ये ‘मुंबई विद्यापीठ'चे उपकेंद्र मंजूर करुन घेतले. कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली परिसरात भव्य स्वरुपात या उपकेंद्रांची इमारत उभारण्यात आली असून याठिकाणी काही अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सदर अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरु नसून या अभ्यासक्रमांची माहितीच विद्यार्थ्याना होत नसल्याने केवळ ११ विद्यार्थीच येथे शिक्षण घेत आहेत.

तर याठिकाणी नेहमीच निवडणूक विभाग निवडणुकीच्या वेळी आपले कार्यालय थाटत असल्याने सदरचे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय? असा सवाल ‘मनसे'ने उपस्थित केला आहे. सदर ठिकाणी गणेशोत्सव काळात कृत्रिम तलाव देखील उभारत गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे या उपकेंद्रात शिक्षणाऐवजी इतर सर्व घडामोडी घडत असल्याचा आरोप ‘मनसे'ने केला आहे. सध्या याठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने केवळ ‘मनसे'ने निवेदन देत उपकेंद्रात सर्व अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली.

‘मुंबई विद्यापीठ' सदर उपकेंद्र सुरु होऊन ५ वर्षे झाली असून फक्त ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ठाणे मधील उपकेंद्रात तब्बल ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपकेंद्रांची कुठलीही जाहिरात नसून केवळ निवडणूक कार्यालय आणि अधिकाऱ्यांना बसण्याचे ठिकाण म्हणून याचा वापर होत आहे. ‘कल्याण'च्या आसपास शेकडो खेडी असून येथील विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हायला हवा. जर कल्याण मधील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होत नसेल तर कल्याणकरांनी उपकेंद्राला दिलेली जागा परत घेण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया प्रकाश भोईर यांनी दिली. तर या ‘मुंबई विद्यापीठ उपकेंद्र'मध्ये सर्व अभ्यासक्रम सुरु न केल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देखील ‘मनसे'च्या वतीने यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी शिष्टमंडळात माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मुरबाड शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्षा नयना भोईर, ‘मनविसे'चे शहर अध्यक्ष विनोद केणे, महिला शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, राजन शितोळे, सचिन शिंदे, रोहन पोवार, सुनील घेगडे, कपिल पवार, महेश बनकर, गणेश लांडगे, संदीप पंडीत, अभिजीत मालुंजकर, विराज चौधरी आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘नवी मुंबई'च्या विकास आराखड्याबाबत पुन्हा जनसुनावणी घेण्याची मागणी