‘आरपीआय'ची आयुक्त दालनात धडक  

नवी मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास महापालिकेकडून दिरंगाई करण्यात येत असल्याने ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या (आठवले) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात डॉ. आंबेडकरांचा पुतळा घेऊन जात जाब विचारला. यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ऐरोली येथील स्मारकाच्या शेजारील मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची अंतिम जागा निश्चित करण्यात आली असून येत्या ११ मार्च रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेची पुढील कार्यवाहीसाठी रिपाई नेत्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

‘आरपीआय'चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ, नवी मुंबई कार्याध्यक्ष युवराज मोरे, डॉ. संदीप माईणकर, बाळू गायकवाड, इम्रान शेख, प्रतिक जाधव, आयुब खान, बाबा माने, डॉ. संकेत डुकरे, सागर सोनकांबळे आदिंच्या शिष्टमंडळाने ७ मार्च रोजी महापालिका आयुक्तांच्या दालनात डॉ. आंबेडकरांचा पुतळा घेऊन धडक दिली. यावेळी ‘आरपीआय'च्या शिष्टमंडळाने पलेमिंगो आणि इतर स्टॅच्यु उभारण्यासाठी नवी मुंबईत जागा आहे; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी महापालिकेला जागा सापडत नसल्याची खंत आयुक्तांसमोर बोलून दाखवली.

यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ऐरोली येथील स्मारकाच्या शेजारील मैदानावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याची अंतिम जागा निश्चित करण्यात आल्याचे तसेच येत्या सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाहीसाठी रिपाई नेत्यांसोबत बैठक घेण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जागेची परवानगी आणि ठोस कार्यवाही न झाल्यास येत्या काही दिवसात आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा ‘आरपीआय'चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा नवी मुंबई निरीक्षक सिद्राम ओहोळ यांनी दिला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिवसेना गोग्रासवाडी विभाग महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा