ठाणे मध्ये ‘इंडिया-महाविकास आघाडी'ची वज्रमुठ

ठाणे ः ‘महायुती'चा ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुजरात मधून आदेश आल्यानंतर ठरणार आहे. अद्याप गुजरात मधून आदेश आलेले नसल्याने यांना तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याची कोपरखळी युवा सेना प्रमुख तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी ठाणे येथे मारली.

‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे ठाणे लोकसभा मतदारसंघातील ‘इंडिया-महाविकास आघाडी'चे उमेदवार राजन विचारे यांनी जोरदार शवतीप्रदर्शन करत २९ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. तत्पूर्वी राजन विचारे यांनी ठाणे मधील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेतले. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाणे येथे ‘इंडिया-महाविकास आघाडी'ची वज्रमुठ पहायला मिळाली.

‘इंडिया-महाविकास आघाडी'चे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने ‘इंडिया-महाविकास आघाडी'चे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

याप्रसंगी आदित्य ठाकरे यांच्यासोबत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)'चे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ‘काँग्रेस'चे मुज्जफर हुसैन, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, ‘काँग्रेस'चे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना उपनेते विजय कदम, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲड. मनोज आखरे, ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश पदाधिकारी रमाकांत म्हात्रे, ‘धर्मराज्य पक्ष'चे अध्यक्ष राजन राजे, ‘काँग्रेस'च्या उपाध्यक्ष राखी पाटील, ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार, ‘नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस'च्या अध्यक्षा पुनम पाटील, ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)' जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे (बेलापूर), द्वारकानाथ भोईर (ऐरोली), प्रभाकर म्हात्रे, अनिश गाढवे यांच्यासह ‘इंडिया-महाविकास आघाडी'चे प्रमुख नेते-पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘इंडिया-महाविकास आघाडी'चे उमेदवार राजन विचारे यांनी २९ एप्रिल रोजी जोरदार शवतीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने ते ठाणेकरांचे प्रेम असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि ठाणे असे जुने नाते आहे. सदर लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्ली मध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘इंडिया-महाविकास आघाडी'कडून शवतीप्रदर्शन...
‘इंडिया-महाविकास आघाडी'चे उमेदवार खा. राजन विचारे यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या रॅलीत शिवसैनिकच नाही तर मोठ्या संख्येने ‘महाविकास आघाडी'मधील पदाधिकारी-कार्यकर्ते ठाण्याच्या जांभळी नाका येथे पहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी ‘शिवसेना'चे जुने जाणते शिवसैनिक राजन विचारे यांच्या रॅलीत पाहायला मिळाले. मोठा जनसमुदाय जमल्याने खा. राजन विचारे यांच्या शवतीप्रदर्शनाची सर्वत्र चर्चा होती. २९ एप्रिल रोजी सकाळ पासूनच भगव्या टोप्या, झेंडे, उपरणे परिधान केलेले शिवसैनिक तलावपाली परिसरात जमू लागले. सकाळी  ११ वाजण्याच्या सुमारास सूर्य डोक्यावर आल्याने उन्हाची काहिली वाढत चालली. जशी रॅलीची वेळ पुढे सरकू लागली तसा शिवसैनिकांसह ‘इंडिया-महाविकास आघाडी'च्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा जोश, उत्साह आणखीच वाढू लागला. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर सह आसपासच्या शहरांमधील साठी, सत्तरीकडे झुकलेल्या अनेक जुन्या शिवसैनिकांचे जथ्थे विचारे यांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत होते. नवी मुंबई, कल्याण मधून लोकल गाड्यांमधून प्रवास करत ठाणेच्या दिशेने येणारे ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांचे लोंढे दुपार पर्यत या भागात येऊन धडकत होते.

१० वर्षात केवळ लूटच -डॉ. जितेंद्र आव्हाड
खा. राजन विचारे यांच्या रॅलीनंतर जांभळी नाका येथे सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी कोपरखळी दिल्यानंतर ‘राष्ट्रवादी'चे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि त्यांच्या खोट्या कामांचा खरपूस समाचार घेतला. १० वर्षात ‘भाजपा'ने केवळ लूटच केलेली आहे. मनमानी कारभार करुन विरोधकांवर खोट्या केसेस दाखल केल्या. माझ्यावर देखील ७ केसेस टाकण्यात आल्या. अडीच लाखाच्या खंडणीत नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना गोवले. पण, त्यांना माहिती नाही की मढवी कोट्याधीश आहेत. अशा प्रकारची खोटी केस मढवी यांच्यावर लावण्याचे काम बागडे यांनी केले. आता ६ महिन्यानंतर लक्षात ठेवू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी विरोधकांना दिला. ‘इंडिया-महाविकास आघाडी'ची मशाल माज जाळण्यासाठी असल्याचे स्पष्ट करीत आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, कार्यकर्ते भडकले की काय होते ते इंदिरा गांधी यांच्या वेळेला पाहिले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश