‘पत्रलेखन'द्वारे विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानासाठी आवाहन

नवी मुंबई : ‘संविधान'ने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने २० मे रोजी होत असलेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये हक्काने बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून मतदान विषयक प्रचार, प्रसाराच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. मुलांनी मागणी केलेल्या एखाद्या गोष्टीला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची बाब लक्षात घेत पत्रलेखन असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे विद्यार्थ्यांनी आपले आई-बाबा यांना पत्र लिहून त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत ‘संविधान'ने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. नवी मुंबई महापालिका शाळांप्रमाणेच खाजगी शाळांतून देखील सदर उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला. अनेक शाळांनी त्याकरिता आपल्या विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र उपलब्ध करुन दिली होती.

‘माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी नक्की मतदान करा' असा आईबाबांना आग्रह करणारे पत्रलेखन मुलांकडून आपल्या पालकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करुन देणारे होते. या पत्रलेखनातून मुलांमार्फत मतदार पालकांना आवाहन तर करण्यात आलेच; शिवाय सध्याच्या समाज माध्यमांतून संदेश आदान-प्रदानाच्या तंत्रस्नेही युगात पत्रलेखनासारख्या दुर्मिळ होत चाललेल्या माध्यमाचा आनंदही या माध्यमातून विद्यार्थ्यांना घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने पालकांनी मतदान करावे, असे आवाहनपत्र लिहिले आणि पालकांनीही या पत्रलेखन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली सदर अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 भिवंडी लोकसभा निवडणूक कामासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज