‘आचारसंहिता'चे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्या

नवी मुंबई : ‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता पालन केली जात असल्याबद्दल विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे. कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांचे विभागप्रमुख आणि सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले.

आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचार फलक यांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करुन देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डींग, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खाजगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्‌घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घ्ोण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वतः पाहणी करुन गांभीर्याने लक्ष द्यावे. असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटी बसेस आणि बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घ्ोण्याच्या सूचनाही आयुवत डॉ. व्ौÀलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत.

यासोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसार माध्यमांचा अधिक चांगला उपयोग करुन व्यापक जनजागृती करावी. यामध्ये विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा. या कक्षाद्वारे नागरिकांना मतदानाविषयी, त्यांचा मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र आदि बाबींविषयी माहिती द्यावी. मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे. त्याचप्रमाणे आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योगसमुह याठिकाणी भेटी देऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याचेही आयुक्त डॉ. शिंदे यांनी निर्देशित केले.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घ्ोऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्टस्‌, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, रुग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्‌ॲप अशा समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करावा. तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून आणि बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करुन जनजागृती करण्याचे सूचित करण्यात आले.

प्रचार, प्रसिध्दी प्रमाणेच मतदान केंद्रांची सर्व आवश्यक सुविधांसह सिध्दता करुन ठेवण्यात यावी. मतदान केंद्रे ‘निवडणूक आयोग'ने सुचित केल्याप्रमाणे तळमजल्यावर असावीत. मतदान केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.

लोकसभा निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडणे, आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष द्यावे. निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांचे विभागप्रमुख व सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे महापालिका तर्फे वसुंधरा दिन साजरा