शहरात कचरा न टाकण्याचे फलक लावून बिट मार्शल नियुक्त करा -आयुवत राव
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता अभियान मोठ्या जल्लोषात राबविण्यात येत आहे. त्यानुसार २० एप्रिल रोजी वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तानसा पाईप लाईनच्या दोन्ही बाजुला जाळ्या बसवाव्यात. कचरा न टाकण्याबाबत फलक लावून परिसरात मार्शलची नेमणूक करावी. तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलून त्वरित स्वच्छता करावी, असे निर्देश महापालिका आयुवत सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
ठाणे मधील वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या सदर ‘सर्वंकष स्वच्छता अभियान'मध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तानसा पाईप लाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत. सुरक्षारक्षक नेमावेत. तसेच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत, त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जावा या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश दिले. तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजुला पडलेले डेब्रीज उचलावे. उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करुन येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
सदर मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त-१ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ‘शिवशांती प्रतिष्ठान'चे स्वयंसेवक उपस्थित होते.
ठाणे महापालिकातर्फे ‘सर्वंकष स्वच्छता अभियान'मध्ये वर्तकनगर मधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फुटपाथची साफसफाई करण्यात आली. उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिर ते उपवन तलाव परिसर, बनारस घट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी (दुभाजक), येऊर फॉरेस्ट ते रिक्षास्टॅण्ड, वर्तकनगर नाका (तानसा), वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिध्दांचल क्लब हाऊस ते एचडीएफसी बँक, आदि परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या ‘सर्वंकष स्वच्छता अभियान'मध्ये महापालिका कर्मचारी यांच्या समवेत ठाणे मधील सेवाभावी सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला. वर्तकनगर प्रभाग समितीच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवणेबाबतची शपथ घेतली. मोहिमेत प्रत्येक प्रभाग समितीतील सामाजिक संस्था आणि सेवाभावी संस्थांनी भाग घेतलेला आहे.
आयुक्त राव यांचा नागरिकांशी संवाद...
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड लावावा. जेणेकरुन नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत. उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल्य टाकतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी मोहिमेवेळी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहन सेवेचा थांबा रस्ता रुंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता. मात्र. तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत. त्यामुळे सदरचा थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यावर याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त सौर राव यांनी यावेळी नमूद केले.
मतदानाबाबत जनजागृती...
वर्तकनगर परिसरात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून आयुक्त सौरभ राव यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांनी २० मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होवून आपला हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले आहे.