राज्यात सध्या ‘कायदा-सुव्यवस्था'चे तीन तेरा -आदित्य ठाकरे

नवी मुंबई : सीवुडस्‌, तुर्भे इंदिरानगर, घणसोली आणि ऐरोली येथे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या ४ मार्च रोजी सभा झाल्या. या सर्व सभांना शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

याप्रसंगी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव वरुण सर देसाई, जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, एम. के. मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, संतोष घोसाळकर प्रकाश पाटील, सुमित्र कडू, सूर्यकांत मढवी, संदीप पाटील, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, काशिनाथ पवार, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, समीर बागवान, पुनम आगवणे, कोमल वास्कर, आदि उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारेवर जोरदार प्रहार केला. राज्यात सध्या ‘कायदा-सुव्यवस्था'चे तीनतेरा वाजलेले असून कायदा-सुव्यवस्था कुठेही दिसत नाही. ३० महापालिकांवर ‘सरकार'ने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासक पाठवण्यासाठी कोटींच्या बोली लागत आहेत. प्रशासकांनी या सरकारच्या एकूण गैरकारभारात आपले हात काळे करु नयेत. २०२४ मध्ये राज्यात आमचे सरकार येणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर हात काळे करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा आ. आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.

राज्यात झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले गेले. मात्र, पेपर फोडणारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘महाविकास आघाडी'चे सरकार सत्तेत आल्यानंतर पेपर फोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी १० वर्ष शिक्षा होईल असा कडक कायदा करण्यात येणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

धोका देऊन सत्तेत आलेल्या ‘शिंदे सरकार'ने महाराष्ट्राची अवस्था दयनीय करुन ठेवली आहे. ‘महाविकास आघाडी सरकार'च्या काळात महाराष्ट्र १०० टक्के प्रगतीपथावर होता. मात्र, आता हीच प्रगती शुन्याच्या खाली गेली आहे. खोटे बोलायचे, जुमला करायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना फसवायचे, हाच कार्यक्रम भाजप आणि शिंदे सरकारने सुरु केला. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत देशातील जनता केंद्रातील ‘मोदी सरकार'ला खाली खेचल्याशिवाय रहणार नाही, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

रिव्हर्स घेर बदलायचा आहे...
‘महाविकास आघाडी सरकार'च्या काळात राज्य प्रगतीपथावर होते. आपण साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आणली होती. आता मात्र गुंतवणूक राज्यात येण्याऐवजी गुजरातला चालली आहे. ‘महाविकास आघाडी'चे सरकार गेल्यानंतर राज्याने रिव्हर्स घेर टाकला आहे. हाच रिव्हर्स गियर आता आपल्याला बदलायचा आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आमच्या नेत्यांची नावे चालत नाहीत...
संभाजीनगर मधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ‘महाविकास आघाडी सरकार'ने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, दोन्ही नावे देण्यासाठी केंद्र सरकारकडून टाळाटाळ चालली आहे. यावरुन केंद्र सरकार महाराष्ट्र विरोधी असल्याचे उघड होत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देश पूर्णपणे कर्जात बुडणार -प्रकाश आंबेडकर