कोकणातील नवान्न पौर्णिमा

कोकणात शिमगा आणि गणपती हे दोन उत्सव सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. घराघरातून साजरा होणारा आणखी एक सण म्हणजे नवान्न पौर्णिमा.‘नवान्न' म्हणजेच नवीन अन्न. नावाप्रमाणेच ह्या दिवसाला महत्व आहे ते अर्थात नव्याने तयार झालेला अन्नाला.

कोकणात पर्जन्यमान हे राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत सव्रााधिक आहे. त्यामुळे ह्या भागाला लाभलेला निसर्गही अत्यंत देखणा आहे. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरांत नवं बांधण्याची परंपरा वर्षांनुवर्षे भक्तीभावनेने जपली जातेय. आश्विन शुद्ध पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा म्हणतात. आश्विन महिन्यात शरद ऋतू सुरू होतो.आश्विन शुद्ध पौर्णिमा जर दोन दिवस असेल तर आदल्या दिवशी रात्री कोजागिरी आणि दुसऱ्या दिवशी नवान्न पौर्णिमा असते. मात्र पौर्णिमा एकाच दिवशी आली तर आधी दिवसा नवान्न पौर्णिमा साजरी करून त्याच रात्री नंतर कोजागिरी पौर्णिमा असा प्रकार पाहावयास मिळतो.

कोकणात अती पावसामुळे भात हे प्रमुख पीक घेतले जाते. त्याबरोबरच नाचणी, वरी ही पिकेही घेतली जातात. गणपती उत्सवानंतर भात पीक तयार होण्यास प्रारंभ होतो. कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी नवरात्रातून करण्याची परंपरा आहे. ह्या दिवसात कापलेले भात पिक पूर्वी उखळांमधून सडून नवान्न पौर्णिमेला त्याचा भात करून नवीन अन्नाची सुरुवात केली जात असे. आता नवीन घर बांधणीत उखळे इतिहासजमा झाली असली तरी आजही नवीन धान्य गिरणीवरून सडून आणून त्या दिवशी पहिला भात नवीन तांदळाचा शिजवण्याची परंपरा सर्वत्र पाळली जात आहे. कोकणातील पूर्वी काही स्थानिक कलाकार बांबूच्या कामटय़ांची नवी तयार करून विक्रीला आणत असत. बांबूच्या पट्ट्या काढून त्यांची नक्षीदार रचना करून सोनेरी कागदाचा वापर करून ही कामट्यांमधील नवी तयार केली जात असत. घराच्या प्रवेशद्वारावर ही नवी लावली जात असत. घराच्या प्रवेशद्वारासह अन्य महत्त्वाच्या वस्तूंनाही ही नवी बांधली जातात. विशेष म्हणजे नवान्न पौर्णिमेला बांधलेले नवं एक वर्ष व्यवस्थित रहात असे. पुढील वर्षी नवीन नवं लावताना मागील वर्षीचं नवं उतरवलं जात असे. पण कामट्यांचे नवी आता दिसत नाहीत.

आता सर्रास धान्न्याच्या लोंबी वापरुन नवी केली जातात. बहुतांश ठिकाणी भाताची लोंब, आंब्याचे पान, कुरडूचं फूल, झेंडूचं फूल हे एकत्र बांधून नवं केलं जातं. नवान्न पौर्णिमेला असं एक नवं देवासमोर ठेऊन त्याची पूजा केली जाते. नंतर अशीच नवी ठीकठिकाणी बांधली जातात. धान्याचे कोठार, तुळशी वृंदावन, गुरांचा गोठा, विहीर आदी ठिकाणी ही नवी बांधली जातात. सर्वत्र भरभराट होऊ दे, असा हयामागचा अर्थ असतो. यादिवशी नवीन तांदळाचा भात, तसेच नवीन तांदळाची खीर करतात. पक्वान्न म्हणून नवीनतांदळाच्या पिठाचे ‘पातोळे' करतात. नव्यामध्ये बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे शास्त्रीय महत्त्व आहे. आंब्याचे पान प्रत्येक शुभकार्यासाठी वापरतात म्हणून आंब्याच्या पानातच नवं बांधलं जातं. कुरडूची फुलेही टिकाऊ आणि औषधी आहेत म्हणून कुरडूच्या फुलांचा समावेश केला जातो. भात, वरी, नाचणी या नवीन पिकांचं स्वागत आणि पूजन करण्यासाठी या पिकांच्या कणसांचा समावेश करण्यात येतो. - अमित पंडित 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

करिअरच्या नव्या दिशा