शरद पवार यांना आता छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव नवीन पक्ष आणि तुतारी चिन्ह मिळाल्याने शरद पवार यांनी या चिन्हाचे अनावरण २४ फेब्रुवारी रोजी रायगडावर केले. यावर ‘मनसेेचे 'अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. कायमच फुले, शाहू, आंबेडकर करणारे पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नव्हते. आता शरद पवार यांना  छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली का? त्यांना रायगड कसा आठवला? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण, ईव्हीएम मशीन, निवडणुकीच्या कामात शिक्षकांना काम यावर प्रकाश टाकतानाच शरद पवार यांच्याबाबत ववतव्य केले.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाध साधतानाच सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचा विचका होत असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात तरुण पिढी राजकारणात येण्याचा विचार करत असेल तर जे सध्याचे राजकारण सुरु आहे ते पाहून काय विचार करत असतील. महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते चांगले संकेत नाही, असे ते म्हणाले.

मनसे ‘महायुती'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर ‘मनसे'चे  पदाधिकारी इतर पक्षांशी बोलताना दिसले याचा अर्थ ते ‘युती'त आले असे होत नाही. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम'वर  बोलताना इतरत्र सर्वच देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका चालतात, तर मग भारतामध्ये अशा निवडणुका का नाही चालत. सामान्य जनता कोणाला मत देते ते सुध्दा त्यांच्या लक्षात येत नाही. मध्यंतरी काही ईव्हीएम वर स्लीप देण्यात येणार होती, असे बोलले जात होते. मात्र, तेही सगळीकडे लागू पडलेले नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम'चा घोळ आहे, ते मी कायमच बोलत होतो. मी सगळ्या गोष्टी आधी अभ्यास करतो त्यानंतर बोलतो असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात बेरोजगारी, दुष्काळ परिस्थिती असताना जातीचे राजकारण होत असताना दिसते. महाराष्ट्राचे वातावरण आणखी खराब होईल. पूर्वीचा महाराष्ट्र होऊ नये याकरिता जनतेने यांना वठवणीवर आणणे पाहिजे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना ‘निवडणूक आयोग'चे अधिकारी कामाला जुंपतात. या सगळ्यांमध्ये ‘निवडणूक आयोग'चे अधिकारी करतात काय? यंत्रणा अपुरी आहे असे ते सांगतात, तर मग ते काम कसे करतात? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणावर बोलताना राज ठाकरे यांनी आमदार गणपत गायकवाड यांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली? त्यांची मानसिक स्थिती अशी का झाली? कोणी आणली? याचाही विचार होणे आवश्यक असून न्यायालयात यावर निर्णय होईल, असे सांगितले.

सदर ‘पत्रकार परिषद'ला ‘मनसे'चे आमदार प्रमोद (राजू) पाटील, अविनाश जाधव, अभिजित पानसे, कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, महिला अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील, दिपीका पेंढणेकर, मनोज घरत, हर्षद पाटील, मिलिंद म्हात्रे, संदीप (रमा) म्हात्रे, सुमेधा थत्ते, शर्मिला लोंढे, श्रीकांत वारंगे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.

सध्या पक्ष विरुध्द पक्ष, चिन्ह विरुध्द चिन्ह अशा पध्दतीने राजकारण लढणे अर्थात महाराष्ट्रातील चांगले चिन्ह नाही. सदर सर्व सुधारायचे असेल तर जनतेने भानावर येणे आवश्यक आहे. या सर्व लोकांना जनतेनेच वटणीवर आणले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे ते ठिक आहे; पण त्यासाठी राज्याच्या पातळीवर काय राजकारण खेळले जाते ते पाहणे खूप महत्त्वाचे आहे. नवीन लोक राजकारणात येत आहेत. मात्र, अशा पध्दतीने राजकारण खेळत असल्याने त्यांना हेच राजकारण खरे असल्याचे वाटते. याआधी कधीही महाराष्ट्रात अशी अस्थिर परिस्थिती मी अनुभवली नाही.
-राज ठाकरे, अध्यक्ष - मनसे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला दिवाळे येथे उत्स्फुर्त प्रतिसाद