संपलं गं नवरात्र...

तुमच्या मिठीत सामावलं की आई तृप्त असते...स्पर्शाचं सुख वेगळंच असतं ...आईला ती जवळीक मनातून फार सुखावते...आता तिला लेकीकडून फक्त एवढंच तर हवं असतं...तेवढंच तीचं मागणं आहे ...आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या....नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं...

देवीचं नवरात्रं आलं आलं म्हणता म्हणता आता संपलं सुध्दा....दिवस कसे भुरकन ्उडून गेले. किती तयारी आणि गडबड चालली होती....माती आणायची, सप्त धान्य पेरायचं  आणि मग .....ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पाती...त्याचा अलवार स्पर्श...तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा.. घट बसवायचे, कडकण्या करायच्या, रोज  एक माळ अर्पण करायची..

 श्री सूक्ताची एकवीस आर्वतन ...सप्तशतीचा पाठ..घागरा घालून केलेला गरबा.. भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर ..नंतर खिरापतीची मजा ...भजनाचे कार्यक्रम..त्यात गोंधळ, जागरण हवाच....कुंकूम्‌ आर्चन,  सवाष्णींच्या ओट्या, कुमारीपुजन...रोज रंगीबेरंगी  जरीच्या साड्या, दागिने...बाहेर जाणं ...सर्वांना भेटणं मग गप्पा ...... टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या ...घरी गोंधळी बोलवायचा. डफ तुंतुण्यावर  म्हटलेली देवीची गाणी ऐकायची.. निरनिराळे ऊपवासाचे पदार्थ ..आरास, रांगोळ्या नऊ दिवस रोज देवी दर्शनाला जायची गडबड.. नवरात्रीची सांगता देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून.....

कसं भारवल्यासारखंच वातावरण असतं नाही का ? दसरा झाला आणि आज बघ.....सगळं  कसं शांत  शांत झालं.
अगं लक्षात घे....नवरात्री पुरतीच देवी आई आली होती का?.....ती जगतजननी आहे. ती इथेच असते. तिच्या देवळात....आपली वाट बघत ऊभीच असते आपण त्या त्या दिवसापुरतं जातो तिच्याकडे... गर्दीत, गोंधळात हारा फुलांच्या राशीत एक मिनिट तिला बघतो ...

आता एक कर.. शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे...देऊळ रिकामं असेल सजावट काढली असेल ...कुठलाही भपका नसेल.... बसावं तिच्यासमोर ..इतर वेळेस पण भेटावं ग देवी आईला....नवरात्र  नसतानासुद्धा सहज आठवण आली म्हणून......

अचानक पण जावं गं....किती बरं वाटेल तीला..आणि आपल्यालाही...
वाचता वाचता तिचे डोळे भरून आले.......
मध्यंतरी फोनवर आईपण हेच म्हणत होती......सवड काढून येत जा बाळा....बघावंसं वाटतं तुला...
वाट बघणारी आई आहे..तोपर्यंत भेटत जा गं तीला ..खूप वेळा असं होतं की आपण आपल्याच विश्वात दंग राहतो..आईला  गृहीतच धरतो...आपल्याच पसाऱ्यात हरवुन जातो. अगदी...घरी असूनही आईशी  निवांत बोलणं होतंच असं नाही....
खरंच मनात याचा शांतपणे विचार करा... आईला तर कुठल्याच भारी साड्या, साज शृंगार, दागिने काही नको......
 तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तुमच्या मिठीत सामावलं की ती तृप्त असते ...स्पर्शाचं सुख वेगळंच असतं ...आईला ती जवळीक मनातून फार सुखावते...आता तिला लेकीकडून फक्त एवढंच तर हवं असतं...तेवढंच तीचं मागणं आहे ...आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या ....
नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं...
-नीता चंद्रकांत कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाचन प्रेरणा दिन