दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
शक्तीरूपेण संस्थिता
देवी आईचा नवरात्र ऊत्सव ऐन बहरात आहे. ती देवी कशी आहे ? नीट बघा..फुलांनी सजवलेल्या देवघरात तिची स्थापना केलेली आहे .अखंड नंदादीप लावलेला आहे. त्याच्या शांत प्रकाशात तिचे रूप न्याहाळून बघा.. केसापासून पायाच्या नखांपर्यंत ती सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत.कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे.
आपली ही देवी आई विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, समंजस, नाजूक आहे.
पण इतकंच तिचं वर्णन आहे का? नाही...ती अष्टभुजा आहे.
तिच्या हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शुल, पाश, खड्ग अशी विविध शस्त्रे आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे. ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे. अत्यंत नाजुक, शांत, कोमल.. पण वेळप्रसंगी ऊग्र, भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी आहे.
राक्षसांना शिक्षा करणारी आहे. निरनिराळ्या रक्षसांना अनेक आयुधांनी शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे. या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता ....एक स्त्री म्हणून बघूया ...तीपण आपल्यासारखीच आहे. अशा या देवीचा दैवी अंश आपल्याही प्रत्येकाच्या शरीरात आहे.
आपण देवीची प्रार्थना करूया.
प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो. आता असा विचार करा की काय मागायचे? लौकिकात जे हवे आहे ते सगळे मागून झालेले आहे. जे आहे त्यात आपण समाधानी आणि तृप्त आहोत. आता तिच्याकडे थोडं वेगळं काही मागू या ...
राक्षस म्हटलं की अति भयंकर, क्रूर, अक्राळ विक्राळ असं काहीस स्वरूप आपल्यासमोर येतं. पण लक्षात घ्या की ...राक्षस ही एक वृत्ती आहे. ती विचारात, कृतीतही असू शकते. ते प्रचंड, मोठेच असतात, त्यांचे आकार भयानक असतात असे नाही.
काही मनाला नकळत सूक्ष्मपणे सतत त्रास देणारेही असतात. काही बहुरूप्यासारखे असतात. वरून गोड गोड बोलून फसवणारेही असतात. त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकुया.....
आपण त्यांच्याशीही लढू या...अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे.त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायलापण अंगी सामर्थ्य यावं लागतं.
ते यायला हवं.....
तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते.
मौन ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. तीपण जिंकता आली पाहिजे. अपप्रवृत्तींचा नाशही करायला हवा आहे... पण आता तेवढ्याने भागणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोशही यायला हवा.... शत्रूला भ्यायचं नाही तर ...त्याच्याशी सामना करायचा ..निकराने आणि सर्व शक्तीनिशी.. लढायचं ...असं ती आपल्याला शिकवते शत्रूला नामोहरम करून, दैत्यांचा संहार मगच देवी थांबते.
विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणू या. वेळप्रसंगी आपल्यालाही दुर्गेचं रूप धारण करायला हवं आहे...
देवीचं गुणगान करा. श्री सूक्त, कुंकुमार्चन देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा.
शंकराचार्यांनी रचलेली देवीची स्तोत्र खूप सुरेख ,नादमय ,जोशपूर्ण आहेत. ती पाठ करा.ती म्हणताना विलक्षण आनंद होतो. देवीची गाणी म्हणा. टाळ हातात घेऊन खणखणीत आवाजात आरती करा. तुमची तुम्हालाच ऊर्जा जाणवेल....आता तिच्याकडे ही प्रार्थना करा...
हे देवी... मला निर्भय आणि सबल कर... आज जगात वावरताना प्रत्येकाला..प्रत्येकीला असं बनायला हवं आहे.तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन. तो मनापासून करा. देवी यश देईलच ..दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत. त्यांच्यात अफाट क्षमता आहे. त्यांचं आत्मभान जागृत झालेलं आहे. तुम्ही थोडा विचार केलात तर तुमच्यासमोरही अनेक नावे येतील.त्यांच्या इतकं आपल्याला जमलं नाही तरी चालेल. पण थोडा आपण प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.
सप्तशतीत देवीचे वर्णन करताना मातृरूपण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीचं वर्णन शक्तीरूपण संस्थिता असेही आहे...हे आपण निश्चित लक्षात ठेवूया. अशा या महिषासुरमर्दिनीला माझा नम्रपणे मनापासुन नमस्कार.
जगतजननी आई तुझ्यासमोर पदर पसरून
एक जोगवा मागते.....
तु आम्हाला आंतरीक बळ दे शक्ती दे.
आणि संकटांशी सामना करायला हिंमत दे.
-नीता चंद्रकांत कुलकर्णी