वाशीमध्ये ‘मराठी विश्व संमेलन'ला सुरुवात

ठाणे : मराठी भाषा आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. ‘मराठी विश्व संमेलन'च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्‌गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे काढले.

मराठी विश्व संमेलन-२०२४'चा उद्‌घाटन सोहळा वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी २७ जानेवारी रोजी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मराठी भाषा-शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास-पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, ‘मराठी भाषा विभाग'च्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन'चे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ‘भाषा सल्लागार समिती'चे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ'चे अध्यक्ष डॉ. राजा दिक्षीत, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ'चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ'च्या अध्यक्ष उषा तांबे, माध्यम सल्लागार जयू भाटकर, ‘मराठी भाषा विभाग'चे उपसचिव हर्षवर्धन जाधव, ‘राज्य मराठी भाषा कोष मंडळ'चे सचिव डॉ. शामकांत देवरे, ‘साहित्य संस्कृती मंडळ'च्या सचिव मीनाक्षी पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले होते. विविध परिसंवाद, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन अशा विविध माध्यमांतून ‘माय मराठी'चा गजर सुरु आहे. मराठी भाषेचे महत्व वाढविण्यासाठी याचप्रकारे आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा पंधरवडाही अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. मराठी भाषेचा वापर वाढत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळविणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीची भाषा ओळखून त्याप्रमाणे साहित्य निर्मिती करायला हवी. त्यातून त्यांच्या मनात मराठी भाषेसाठी आपुलकी निर्माण होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला देशभरातून तसेच जगभरातून पसंती मिळत आहे. ‘वर्ल्ड इकॉनोमी फोरम'च्या माध्यमातून ३.५३ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले आहेत. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचे नाव उज्वल केले आहे. आपली अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरुन आता पाचव्या क्रमांकावर आली असून आपले ध्येय आहे ते आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी मांडलेली पाच ट्रिलियन डॉलर संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. याचमुळे परदेशातील अनेक मराठी उद्योजक आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही आपले उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य शासन करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘नवी मुंबई महोत्सव'ची जल्लोषात सांगता