कळंबोलीतील बेपत्ता तरुणीची प्रियकराकडून हत्या

हत्येनंतर प्रियकराची आत्महत्या  

नवी मुंबई  कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने खारघर येथील टेकडी परिसरात गळा आवळून हत्या केल्याची आणि त्यानंतर त्याने स्वतः देखील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महिन्याभरानंतर उघडकीस आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर टेकडी परिसरात १० दिवस अथक शोध मोहिम राबवून तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शोधून काढल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.  

या घटनेतील मृत तरुणी वैष्णवी मनोहर बाबर (१९) कळंबोली, सेक्टर-१ मध्ये कुटुंबासह राहण्यास होती. तसेच ती मुंबईतील सायन येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर तिची हत्या करणारा तिचा प्रियकर वैभव बुरुंगले (२४) देखील कळंबोली येथे राहत होता. या दोघांचे मागील ५ वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. १२ डिसेंबर रोजी सकाळी वैष्णवी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र, वैष्णवी रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने कळंबोली पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल केली होती. कळंबोली पोलिसांकडून बेपत्ता वैष्णवीचा शोध सुरु असताना, त्याच दिवशी वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरुंगले याने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ लोकलसमोर उडी टाकून आत्महत्या केली होती.

कळंबोली पोलिसांकडून बेपत्ता वैष्णवीचा शोध न लागल्याने विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तसेच सदर प्रकरणाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे आणि त्यांच्या पथकाने वैष्णवी आणि वैषव या दोघांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. यात वैष्णवी बाबर आणि वैभव बुरुंगले दोघेही १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत एकत्र खारघर हिल्स परिसरात असल्याचे दिसून आले. तसेच त्याच दिवशी वैभव याने वैष्णवीची हत्या करुन जुईनगर रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केल्याचे त्याच्या मोबाईल मधील सुसाईड नोटवरुन उघडकीस आले.  

सुसाईड नोटस मधील सांकेतिक शब्दामुळे लागला मृतदेहाचा शोध...
वैभव १२ डिसेंबर रोजी सायन येथे वैष्णवीच्या कॉलेजमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने तिला सोबत घेऊन खारघर टेकडीवरील दुर्गम झुडप गाठले होते. त्याठिकाणी त्याने पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पट्टीच्या सहाय्याने वैष्णवीची गळा आवळून हत्या केली. ज्या झाडाजवळ वैभवने वैष्णवीची हत्या केली, त्या ठिकाणावरील झाडांच्या मोजणीसाठी वन विभागाने (एल ०१-५०१) टाकलेला नंबर वैभवने आपल्या सुसाईड नोटमध्ये शेवटी टाकला होता. एल ०१-५०१ या सांकेतिक शब्दाचा अर्थ पोलिसांना सुरुवातीला लक्षात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी १० दिवस येथील दुर्गम भागात वेगवेगळ्या माध्यमातून वैष्णवीच्या मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, त्यांना मृतदेह सापडला नाही. पोलिसांनी नंतर वन विभागाच्या मदतीने एल ०१-५०१ या नंबरच्या झाडाचा शोध घेतल्यानंतर त्याच झाडाजवळ वैष्णवीचा कुजलेला मृतदेह सापडला.  

पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्याचा वैभवला विश्वास...  
वैभवने मागील तीन महिन्यांपासून वैष्णवीच्या हत्येची योजना आखल्याचे त्याने लिहून ठेवलेल्या ८ पानी चिट्ठी मधील मजकुरावरुन आढळून आले आहे. त्यात त्याने पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्यासाठी ज्या दिवशी वैष्णवीची हत्या करणार, त्याच दिवशी तो देखील जीवन संपवणार असल्याचे चिट्ठीमध्ये लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे वैभव याने लोकलसमोर आत्महत्या करण्यापूर्वी देखील आपल्या मोबाईलवर मेसेज टाईप करुन वैष्णवीची हत्या केल्याचे तसेच सदरचा मोबाईल आपल्या कुटुंबियांना अथवा पोलिसांना देण्यास सांगितल्याचे आढळून आले आहे.  

वैभव आणि वैष्णवी या दोघांमध्ये पाच वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यातच मागील काही महिन्यांपासून वैष्णवीला एका तरुणाचा फोन येत होता. त्यामुळे वैष्णवी त्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा वैभवला संशय होता. यावरुन दोघांमध्ये भांडण देखील होत होते. यावरुन वैष्णवी आपल्यापासून दुरावत असल्याच्या वैभवला संशय होता. त्यामुळेच त्याने वैष्णवीची हत्या केल्याचे आढळून आले आहे.   - अमित काळे, पोलीस उपायुवत (गुन्हे शाखा), नवी मुंबई. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत तुर्भे वाहतूक शाखेकडुन वाहन चालकांमध्ये जनजागृती