रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट

‘परिवहन विभाग'तर्फे गौरव

नवी मुंबई : राज्यात रस्ते अपघात आणि अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनातर्फे मागील वर्षी ठरवण्यात आले होते. यात राज्यातील जिल्ह्यांमध्ये, विभागांमध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा प्रथम आणि चंद्रपूर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर नवी मुंबई शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

‘परिवहन विभाग'तर्फे ‘राज्य रस्ता सुरक्षा अभियान-२०२४'चा उद्‌घाटन सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पाडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नवी मुंबई शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे आणि ‘नवी मुंबई'च्या उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग, मुंबई वाहतूक विभागाचे सह-पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ, आदि मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई शहरात पोलीस विभाग, महापालिका, सिडको, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट (वारंवार अपघात होणारे) अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, तपासणी आणि अभ्यास करुन त्यातील त्रुटी शोधून काढत आवश्यक ते बदल करुन अपघात संख्या कमी करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबई शहरामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या १७.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०२३ या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंतची आकडेवारी लक्षात घेता नवी मुंबई विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई परिसरातील रस्ते अपघात आणि मृत्यू संख्या कमी करण्यामध्ये नवी मुंबई पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि महापालिका या सर्व विभागांनी घेतलेल्या परिश्रमाचे शासनाने कौतुक केले आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 कार मधील लॅपटॉप चोरणारे आंतरराज्य टोळीतील त्रिकुट जेरबंद