नवी मुंबई शहरातील पोलीस बिट चौक्या धूळखात?

अहमद जावेद यांची बदली होताच पोलिसांचे दुर्लक्ष

वाशी : नवी मुंबई शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी, या उद्देशाने तत्कालीन नवी मुबंई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी नवी मुंबई शहरातील प्रत्येक सेक्टर, गावागावात पोलीस बिट चौक्यांची उभारणी केली होती. मात्र, अहमद जावेद यांची बदली होताच या पोलीस बिट चौक्यांकडे नवी मुंबई पोलीस आयुवतालय प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले असून, या पोलीस बिट चौक्या आज धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे या चौक्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी आता नवी मुंबई शहरातील नागरिक करु लागले आहेत.

सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणासोबतच नवी मुंबई शहरात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माजी नवी मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी २०१० मध्ये प्रत्येक प्रभागात पोलीस बिट चौक्या उभारल्या होत्या. तसेच कोणी तक्रारदार आल्यास त्यांची त्याच ठिकाणी तक्रार नोंदवली जावी आणि तक्रारदारांची पोलीस स्टेशन पर्यंत येण्याची पायपीट थांबावी, या हेतूने पोलीस बिट चौक्यात किमान दोन पोलीस कर्मचारी उपलब्ध असतील, अशी तजविज अहमद जावेद यांनी केली होती. अहमद जावेद जोपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी होते तोपर्यंत पोलीस बिट चौक्यांचा कारभार व्यवस्थित सुरु होता. मात्र, अहमद जावेद यांची बदली झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी या चौक्यांकडे पाठ फिरवली. परिणामी आज बऱ्याच पोलीस बिट चौक्या बंद असून, धूळखात पडल्या आहेत.

आजकाल नवी मुंबई शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट वाढला असून, घरफोडी आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस बिट चौक्या पूर्ववत सुरु राहिल्या तर बऱ्याच अंशी गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसणार असून, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरीकांना तात्काळ फिर्याद नोंदविण्याकरिता बंद असलेल्या पोलीस बिट चौक्या खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी आता नागरीकांकडून जोर धरु लागली आहे.

नवी मुंबई शहरात सध्या मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट होण्यासह चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील बंद असलेल्या पोलीस बिट चौक्या पुन्हा सुरु केल्या तर चोरांवर पोलिसांचा काही अंशी धाक  राहील आणि काही अनुचित प्रकार घडला तर पोलीस बिट चौकी जवळच असल्याने पोलीस ठाणे पर्यंत जाण्याची तक्रारदारांची पायपीट देखील थांबेल. - मनोज देसाई, सामाजिक कार्यकर्ते नवी मुंबई. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ