भिवंडीत १ हजारहुन अधिक तर राज्यात २ लाख बांग्लादेशी नागरिक
भिवंडी : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात १ हजाराहून अधिक बांग्लादेशी नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिले असून यापैकी शेकडो बांग्लादेशी नागरिकांना जन्म दाखला म्हणून स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतींच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात २ लाख बांग्लादेशी नागरिक वास्तव करीत असल्याची धवकादायक माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत दिली. दरम्यान, या बांग्लादेशी नागरिकांना पुरावा म्हणून शासकीय कागदपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे सोमय्या यांनी प्रसारमाध्यांना सांगितले.
अभिनेता सैफ अली खान वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात बांग्लादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात पोलीस यंत्रणा अलर्ट होऊन ठिकठिकाणी छापेमारी करुन बांग्लादेशी नागरिकांची धरपकड करीत आहेत. एकट्या भिवंडी शहरात गेल्या वर्षभरापासून ते आतापर्यत ८० हुन अधिक बांग्लादेशी नागरिक वास्तव करीत असल्याचे कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २३ जानेवारी रोजी भिवंडी तहसीलदार कार्यलयात येऊन तहसीलदारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी उशीरा जन्म दाखल घेणाऱ्या नागरिकांची नोंद तपासणी असता यामध्ये भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात १ हजाराहून अधिक बांग्लादेश नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिले असून यापैकी शेकडो बांग्लादेशी नागरिकांना जन्म दाखला म्हणून स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतींच्या वतीने जन्म दाखले देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम वस्त्या असलेल्या खोणी, महापोली आणि पडघा-बोरीवली या ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यांनी शेकडो बांग्लादेशींना जन्म दाखले दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, बांग्लादेशी नागरिकांना पुरावा म्हणून ग्रामपंचायत तर्फे दिलेल्या जन्म दाखल्यांची संपूर्ण चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.