स्वच्छता अभियान लोकचळवळ बनावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : सर्वंकष स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र, सदर स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळवळीत रुपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर साफसफाईची सुरुवात १३ जानेवारी रोजी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, परिवहन सभापती विलास जोशी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, आदि उपस्थित होते.     

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हातात झाडू घेवून कौपिनेश्वर मंदिर परिसरात झाडलोट केली. तद्‌नंतर मंदिराचा मुख्य सभामंडप आणि परिसराची पाण्याने साफसफाई केली. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिराच्या साफसफाईला स्वतः सुरुवात करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संवादही साधला. मुंबई- ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे या शहरांमधील प्रदुषणाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ु यांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे, ती आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 मुंबई, ठाणे मधील ‘सर्वंकष स्वच्छता अभियान'मध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत. त्यामुळे अभियान मर्यादित स्वरुपाचे न राहता त्याचे रुपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे. यासाठी या ‘अभियान'मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या मध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ठाणे महापालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Campaining) अंतर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरु आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

धार्मिक स्थळांच्या, ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे