खारघर : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र खारघर मधील रस्त्यावर विविध एजन्सीकडून खोदकाम करताना झालेले खड्डे जैसे थे पडून त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे. पावसाळ्यात पाणी साचून अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असून मान्सून पूर्वी रस्ते दुरुस्ती करावे असे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांना दिले.
खारघर परिसरातील विविध सेक्टर मध्ये महावितरण, मोबाइल कंपन्या, महानगर गॅस आदी कंपन्यांकडून तसेच जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. सदर कंपन्यास सिडकोकडून खोदकामाची परवानगी देताना सदर सिडको रस्ते पूर्ववत करण्यासाठी सिडकोकडून भरमसाट रक्कम वसूल केले जाते, मात्र रस्ते दुरुस्ती केली जात नाही. त्यात खारघर वसाहतीत अनेक वर्षांपासून डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. खारघर मधील नादुरुस्त रस्त्यासाठी भाजपाकडून एक वर्षांपासून पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र सिडकोकडून दुर्लक्ष केले जात आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात चालणे व वाहन चालविणे अतिशय धोक्याचे आहे. नादुरुस्त रस्त्याची कामे मान्सून पूर्वी झाले नाही आणि रस्त्यावरील खड्यात पडून अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असे ब्रिजेश पटेल यांनी यावेळी कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांना सांगितले. शिष्टमंडळात खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजीभाई बेरा, स्थायी समिती सभापती ऍड.नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, सरचिटणीस दीपक शिंदे, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, उपाध्यक्ष संजय घरत, निर्दोष केणी, सस्मित डोळस, काशिनाथ घरत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.