कडक उन्हाचा बटाट्याच्या उत्पादनाला फटका, आवक घटल्याने दरात वाढ
नवी मुंबई -:वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारात मागील तिन आठवड्यापासून कांद्याचे दर स्थिरावले आहेत, मात्र बटाट्याच्या आवक मध्ये घट झाल्याने दरात वाढ होत आहे. सध्या वातावरणात उन्हाचा पारा वाढत असून गरमी वाढत आहे, त्यामुळे बटाटे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात बटाटा कमी प्रमाणात दाखल होत असून आवक निम्यावर आली असून केवळ ३० गाड्या दाखल होत आहेत.
कृषी उत्पन्न बाजारात मोठ्या प्रमाणात गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथून बटाटा आवक होत असतो. मात्र आता उन्हाळ्यात गर्मीमुळे बटाटा उत्पादनावर परीणाम होत आवक घटली असून सध्या बाजारात ३० गाड्या दाखल होत आहेत, मात्र एरव्ही दरवर्षी या हंगामात ५०-६० गाड्या दाखल होतात. आवक निम्यावर आली आहे. त्यात बटाट्याची दर वाढ होत आहे. मागील आठवड्यात प्रतिकिलो १२-१८ रुपयांनी उपलब्ध असलेले बटाटे आता १५-२० प्रतिकिलो रुपये उपलब्ध आहेत. अशी माहिती कांदा बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.
वेफर्स बटाट्याची मागणी वाढली
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत वेफर्ससाठी लागणारा विशिष्ट आकार आणि प्रकारचा बटाटा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ज्योती, लोकर, इत्यादी जातीच्या बटाट्याला वेफर बनवविण्यासाठी अधिक मागणी असते. सध्या बाजारात या बटाट्याच्या १० गाडी आवक होत असून २० ते २२ प्रतिकिलो रुपयांनी हा बटाटा विकला जात आहे.