भेंडखळ  खाडीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे, हजारो मासे मृत्युमुखी ; प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण  : उरण तालुक्यात दिवसेंदिवस औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढत होत आहे. परंतु वाढत्या औद्योगिकीकरणातील दुषित पाणी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील खाडीतील व गावोगावच्या नाल्यातील पाणी दुषित होत आहे. त्यामुळे समुद्रातील, खाडी किनाऱ्यावरील विविध प्रकारच्या जातींचे मासे हे मुत्यू अवस्थेत पडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. सदर घटनांकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, मत्स्य आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करत असल्याने अशा दुषित पाण्याच्या व मेलेल्या माशांच्या उग्र वासाने भेंडखळ गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न  गहन बनला आहे.
 
     उरण तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक प्रकल्पातील दुषित, केमिकल मिश्रीत दुषित पाणी हे समुद्राच्या पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे वारंवार समुद्रातील मासे हे नागाव,जसखार, धुतूम, चिर्ले, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर मुत्यूमुखी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांवर उपासमारीचे संकट ओढावत आहे .त्यात समुद्रात, नाल्यात जाणाऱ्या ज्वलनशील पदार्थांमुळे नागाव व जेएनपीटी परिसरात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा गंभीर समस्येकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, मत्स्य आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा  करतअसल्याचे निर्दशनात येत आहे.
 
   शासकीय प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभाराचा फायदा उठवत सध्या भेंडखळ आणि बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील कंटेनर यार्डच्या व्यवस्थापनाने सदर ग्रामपंचायत हद्दीतील समुद्राच्या खाडीत विषारी केमिकल मिश्रीत पाणी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने मागील काही दिवसांपासून खाडीतील, नाल्यातील विविध जातींचे मासे मुत्यू मुखी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत यांचा फटका हा मासेमारी करणाऱ्या बांधवांना सहन करावा लागत आहे. तसेच खाडीतील मेलेल्या माशांमुळे व खाडीतील दुषित केमिकल मिश्रीत पाण्याच्या उग्र वासाने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी महसूल व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी भेंडखळ गावातील रहिवाशी करत आहेत.
 
    समुद्रातील व खाडीतील मासेमारीवर आपआपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या बांधवांवर सध्या उपासमारीचे संकट ओढावले आहे. तसेच खाडीतील दुषित केमिकल मिश्रीत पाण्याच्या उग्र वासाने व खाडीत व नाल्यात मेलेल्या माशांच्या उग्र वासाने भेंडखळ गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे,कोकण आयुक्त व रायगड जिल्हाधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी भेंडखळ गावातील सामाजिक कार्यकर्ते हरेश सुरेश पाटील यांनी एका निवेदनातून केली आहे.

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लिडार तंत्रज्ञानाव्दारे मालमत्ता सर्व्हेक्षण कार्यवाहीला वेग – आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा