नेरूळमधील गटारांची तळापासून सफाई करा : गणेश भगत
नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दरवरवही नाले सफाई अंतर्गत नाले आणि गटारांची सफाई केली जाते. मात्र यादरम्यान गटारे पूर्ण साफ न केल्याने पावसाळ्यात पाणी भरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ या विभागातील गटारांची तळापासून सफाई करावी अशी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळा पावणे दोन महिन्यावर आल्याने पावसाळीपूर्व कामांना परिसरात सुरूवात होणार आहे. त्यामुळे नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ मधील सर्व गटारांची तळापासून सफाई होणे आवश्यक आहे. जेणेकरून पाऊस पडल्यावर कोठे पाणी तुंबणार नाही व प्रभागात पाणी साचून साथीच्या आजारांना खतपाणी मिळणार नाही. आता कोरोना महामारीच्या सावटातून नवी मुंबई पूर्णपणे मुक्त झालेली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरी कामांना गती मिळणे आवश्यक आहे. गटारांची लवकरात लवकर तळापासून सफाई झाल्यास व गटारातून काढलेला कचरा त्वरीत घेवून गेल्यास दुर्गंधीही कमी होईल. संबंधिताना नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ मधील गटारांची तळापासून सफाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.