दक्षता जनजागृती सप्ताह

नवी मुंबई ः ‘जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन' अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने कोकण भवनमध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चा प्रारंभ करण्यात आला. विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेतली. याप्रसंगी उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) राजलक्ष्मी येरपुडे, आदि उपस्थित होते.

दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात येते. त्या सप्ताहात ‘दक्षता जनजागृती सप्ताह' केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या २०२२ या वर्षी केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसित भारत' अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.  यावेळी गिरीश भालेराव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दक्षता जनजागृती सप्ताह' निमित्त जनतेला  दिलेल्या संदेशाचे वाचन केले. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घाऊक बाजारात कांदा ३५ रुपयांवर