दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लुटमार थांबवण्याची ‘हिंदु जनजागृती समिती'ची मागणी
नवी मुंबई ः खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ऐन सणासुदीला प्रचंड भाडेवाढ करुन प्रवाशांची लुटमार आता नित्याचीच झाली आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लुटमार थांबवण्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती'च्या ‘सुराज्य अभियान'च्या अंतर्गत राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सदर निवेदनाच्या अनुषंगाने परिवहन आयुवत भीमनवार यांनी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. सदर शिष्टमंडळामध्ये ‘सुराज्य अभियान'च्या अधिवक्ता किशोरी कुलकर्णी, भगवा गार्डचे राष्ट्रीय समन्वयक अवधूत वसंत, ‘नॅशनल प्रोग्रेस युथ असोसिएशन'चे रोहिदास शेडगे, ‘सुराज्य अभियान'चे अभिषेक मुरुकटे उपस्थित होते.
मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रवाशांना तक्रारीसाठी देण्यात आलेली लिंक उघडत नसल्याचे यावेळी शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिल्यावर ती दुरुस्त करण्याचे आश्वासन आयुक्त भीमनवार यांनी दिले. तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनीवर कोणी उचलत नसल्याचे सांगितले, त्यावर व्हॉटस्ॲपवर तक्रार नोंदवण्याची सुविधा निर्माण करु, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. शिष्टमंडळाने नोंदवलेल्या तक्रारींवर उपाययोजना काढण्याविषयी मासिक बैठकीमध्ये सर्व प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना करु, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ऑनलाईन भरमसाठ दर आकारणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी सक्षम कायदा नसल्यास त्यासाठीचे ठोस धोरण परिवहन विभागाने निश्चित करायला हवे. तसेच यावर परिवहन विभागाकडून ठोस कारवाई झाली नाही, तर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला न्यायालयीन कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही ‘सुराज्य अभियान'च्या वतीने देण्यात आला.
परिवहन आयुक्तांच्या आदेशावर कारवाई होण्यासाठी १६ ठिकाणी निवेदने ‘हिंदु जनजागृती समिती'च्या ‘सुराज्य अभियान'च्या अंतर्गत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांची आर्थिक लुटमार थांबावी, यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग सेंटरवर शासनमान्य तिकीट दर लावण्याचे निर्देश परिवहन आयुक्त भीमनवार यांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी दिले होते. परंतु, राज्यातील बहुतांश ठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग सेंटरवर अद्यापही शासनमान्य तिकीट दर लावण्यात आलेले नाहीत. योग्य पध्दतीने या निर्णयाची
अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील जळगाव, पेण, सातारा, कराड, अमरावती, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण, चंद्रपूर आणि अकोला अशा १६ ठिकाणी प्रादेशिक, उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी निवेदने देण्यात
आली.