रात्रीचे आठ... अन्‌ मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ

नवी मुंबई ः मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते, ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री शिंदे देखील आलेल्या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाहीत. ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ पर्यंत मुख्यमंत्री शिंदे नागरिकांना भेटत होते. योगायोगाने या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस झाले. त्यावेळी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे ना. एकनाथ शिंदे कायम सांगत असतात. त्याची प्रचिती त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. सामन्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेले कुतूहल, आपुलकी आणि आपल्यातील मुख्यमंत्री यामुळे त्यांना भेटायला आलेल्यांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हल्ली मंत्रालयात अभ्यागतांची वाढती संख्या  विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी जास्त आढळून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यांची निवेदने स्वीकारुन म्हणणे ऐकून घेतले जाते.

७  ऑवटोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा-भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या  समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विलेपार्ले येथील नियोजित कार्यक्रमासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणे आठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दिडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.

नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कस जायचे म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली, त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. एवढ्या उशिराही मुख्यमंत्री भेटताहेत, ते पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. नंतर रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्यसनमुक्तीचा विचार आणि संदेश या किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम