पुढील वर्षापासून वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

नवी मुंबई ः आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी अर्हता दिनांक होता. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र, २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय मध्ये २ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारुप मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील मतदारयादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यानचा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर त्याच्या नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अपात्र मतदाराची वगळणीही महत्त्वाची असते, असे यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी नमूद केले.

यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १९, २० नोव्हेंबर आणि ३, ४ डिसेंबर २०२२ या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी, तर २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या आणि विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घ्ोतली जाणार आहेत. तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा एनव्हीएसपी (ऱ्न्न्एझ्), व्होटर पोर्टल (न्न्दूाी झ्दीूीत्) या संकेतस्थळावर आणि व्होटर हेल्पलाईन (न्न्दूाी पत्ज्त्ग्हा) या मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १० नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाणार आहे. त्या अंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत, असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.


मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे तसेच प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऍन्टी करप्शन ब्युरोच्या वतीने दक्षता जनजागृती सफ्ताहानिमित्त विविध कार्यक्रम