तीन अपत्य असणार्‍या कर्मचार्‍यांना आयुक्तांचे अभय

तीन अपत्ये असणारे सेवक पालिकेत ‘अबाद’

नवी मुंबई :  देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेचे ५५ भ्रष्ट  कर्मचारी बडतर्फ तर ५३ कर्मर्‍यांवर निलंबनाच्या कारवाईची घटना ताजी असतानाच नवी मुंबई महापालिकेत तीन अपत्ये असतानाही वर्षांनुवर्ष अनेक अधिकारी-कर्मचारी सेवेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यातील काही कर्मचार्‍यांना पालिकेने यापुर्वी बढती दिली आहे. तर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करण्या ऐवजी त्यांना बढतीसाठी ट्रेनिंगसाठी पाठविण्याचा घाट घालण्यात आला आहे. या विरोधात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आवाज फाउंडेशनने न्यायालयात (पीआयएल) जनहित याचिका दाखल केली आहे.

  आवाज फाउंनडेशनच्या अध्यक्षा सुषमा मौर्या, फाउंडेशनचे कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड.फिरोज शेख यांनी नेरुळ येथे पत्रकार परिषद घेऊन पालिकेत सुरु असणार्‍या गलथान व भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचला.

  सुषमा मौर्या माहिती देताना म्हणाल्या की, शासकीय सेवेत गट अ,ब,क,ड संवर्गात २८ मार्च २००५ च्या शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेवर तिसरे अपत्ये असलेल्या कर्मचार्‍यांची चाचणी नमुंमपाकडून करण्यात न आल्याने ४० कर्मचारी पालिकेत भ्रष्टाचारी मार्गाने सेवा करत असल्याचा आरोप केला आहे. यापैकी ९ कर्मचार्‍यांची माहिती फाउंडेशनने पुराव्यानिशी जमा केली असून त्यात पालिकेच्या अग्निशमक दल व एक पालिकेच्या शाळा क्रमांक ११५ चे शिक्षक व लेखा विभागातील कर्मचार्‍याचा समावेश  आहे. लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्रात देखील याची माहिती लपविण्यात आली आहे. याबाबत १ मार्च २०२२ रोजी तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर,मंत्रालयातील सामान्य व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानंतर पालिका स्तरावर आयुक्तांकडून वर्षभरात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १९ जानेवारी २०२३ रोजी अग्शिमक दलातील तीन अपत्ये असणार्‍या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नियमांचे सर्रासपणे उलंघ्घन करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्यानंतर त्यातील अग्निशमक दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी प्रशांत गोळे व गणेश  गाडे  यांना स्टेशन अधिकारी प्रशिक्षणासाठी पाठविणे म्हणजे जनतेने दिलेल्या कररुपाच्या पैशांची उधळपट्टी करत अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणाल्या. पालिकेत अशा प्रकारे अनेक कर्मचारी कामावर असून आयुक्त व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मौर्या यांनी केला आहे.

 याविषयी बोलताना अ‍ॅड.फिरोज शेख  म्हणाले की, संविधानिक नियमांची पायमल्ली करत आयएएस दर्जाचे अधिकारी राजेश नार्वेकर कर्मचार्‍यांना पाठिशी घालत असल्याचे म्हटले आहे. याबाबत आवाजने केलेल्या तक्रारीनंतर कोणतेही उत्तर न दिल्याने या विरोधात  जानेवारी २०२३ रोजी  न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. अग्निशमक दलाच्या दोघां कर्मचार्‍यांना बढतीसाठी सहा महिने ट्रेनिंगला पाठवून आयुक्त राजेश नार्वेकर एक प्रकारे या अधिकार्‍यांच्या चुकांवर पाघंरुण घालत असल्यचा आरोप अ‍ॅड.शेख यांनी केला आहे. नावाजलेल्या नमुंमपात मोठया प्रमाणावर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून भ्रष्टाचार होत असून जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी थांबविण्यासाठी त्याच बरोबर तीन अपत्यांची माहिती लपवून शासकीय नियमाला पायदळी तुडवणार्‍या कर्मचारी व  वरिष्ठांवर काठोर कारवाई व्हावी, यासाठी आवाज फाउंडेशन कायदेशीर लढा उभारणार असल्याचे अ‍ॅड.फिरोज शेख म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा पादचारी पुलाचे काम  कधी पूर्ण होणार ?