ईटीसी केंद्रात मुलांच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसून येत असल्याच्या पालकांच्या प्रतिक्रिया

दिव्यांगांकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश

नवी मुंबई ः दिव्यांगांविषयी केवळ सहानुभूती नाही तर त्यांना आपुलकीचा हात देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम ईटीसी केंद्रामार्फत केले जात आहे. यामध्ये काळानुरूप दिव्यांग सबलीकरणासाठी आणखी काही उपक्रमांचा समावेश करण्याच्या दृष्टीने सूचना कराव्यात. तसेच दिव्यांगांसाठी अर्थसंकल्पात राखून ठेवण्यात येणारी अर्थसंकल्पाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग कल्याणकारी गोष्टींसाठी खर्च होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

ईटीसी केंद्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेत असताना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच दिव्यांगांच्या पालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई आणि ईटीसी केंद्राचे विभाग प्रमुख तथा परिमंडळ-१चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि कार्यकारी अभियंता सुनिल ला़ड उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांची संख्या माहित असावी यादृष्टीने सन २०१० मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. सद्यस्थितीत ईटीसी केंद्रामार्फत स्विकार पोर्टल सुरु असून त्यावर दिव्यांग व्यक्ती आपल्या नावाची आणि दिव्यांग प्रकाराची नोंदणी करु शकतात. या अनुषंगाने महापालिकेने सर्वेक्षण प्रक्रिया करण्याचे ठरविले असून शाळांमध्ये अर्ज वितरण करुन सर्वेक्षण तसेच मोबाईल बेस्ड ॲपद्वारे सर्वेक्षण असे २ प्रकारे करावयाची नियोजित असलेली दिव्यांग सर्वेक्षण प्रक्रिया तत्परतेने करावी, असे निर्देश यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

सादरीकरणाद्वारे विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची माहिती जाणून घेण्याबरोबरच आयुक्तांनी शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विविध कक्षांना भेटी देत तेथे सुरु असलेली शिक्षण पध्दती प्रत्यक्ष अनुभवली. तसेच तेथे उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. ईटीसी केंद्रात आल्यानंतर मुलांच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसून येत असल्याच्या पालकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया जाणून घेत आयुक्तांनी त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहन व्यवस्था असण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांचा विचार करुन लवकरात लवकर सदर सुविधा उपलब्ध करुन देण्याची त कार्यवाही करावी. सद्यस्थितीत दिव्यांगत्वाचे प्रमाण काहीसे वाढत असल्याचे निदर्शनास येत असून ईटीसी केंद्राची मर्यादा लक्षात घेता जास्तीत जास्त दिव्यांग मुलांना शिक्षण प्रशिक्षण मिळून ते आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशा प्रकारे कार्यवाही करिता खाजगी शाळांनाही काही प्रमाणात अनुदान देऊन त्यांची मदत घेण्याचा पर्याय तपासून पहावा, अशी सूचना आयुवत नार्वेकर यांनी यावेळी केली.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणा-या विशेष शिक्षकांची ईटीसी केद्रातील गरज लक्षात घेऊन आवश्यक पदांचा आकृतीबंध शासनाकडून मंजूर करून घेणेबाबत प्रयत्न केले जावेत. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता व्यावसायिक प्रशिक्षण अधिक मोठ्या प्रमाणात सुरु करावे. खेळाच्या माध्यमातूनही दिव्यांगांचा विकास अधिक गतीमानतेने होऊ शकतो. तसेच त्यांच्यामधील अंगभूत क्रीडा गुणांनाही उत्तेजन मिळू शकते यादृष्टीने उत्तम दर्जाचे दिव्यांग क्रीडा संकुल उभे करण्याबाबतही काम करावे, असे आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिका तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन