मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिका तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

महापालिका कर्मचाऱ्यांना मराठी शुध्दलेखन नियमाची शिकवण

नवी मुंबई ः जास्तीत जास्त लोकांना कळावी या दृष्टीने प्रत्येक भाषेची प्रमाण भाषा निश्चित केली जात असून प्रमाण भाषेत लिहिल्यास त्याचे आकलन अधिकाधिक लोकांना होते. त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिणे आणि त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. या दृष्टीने कोणत्याही भाषेचे व्याकरण अत्यंत महत्वाचा विषय असून तो जर हसत खेळत मनापासून शिकला तर त्यामध्ये गोडी वाढते, असे मत व्यक्त भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी व्यवत केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिका तर्फे आयोजित विविध उपक्रमात भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी शुध्द लेखनाचे नियम या विषयावर सादरीकरण करीत सोपी उदाहरण देत शुध्द कसे लिहावे याबाबत मार्गदर्शन केले. चाळके यांनी सहज सोप्या पध्दतीने दिलखुलास संवाद साधला.

शुध्द म्हणजे पवित्र नाही तर अचूक हे सुरुवातीलाच विषद करीत सध्या प्रमाण मराठी भाषाऐवजी मराठी इंग्लिश मिश्रीत मिंग्लीश वेगळीच भाषा ऐकायला मिळते. सध्या जगण्याची भाषा महत्वाची झाली असून आपली जीवनभाषा आपल्याला कळायला हवी असा आजचा काळ असल्याचे चाळके यांनी स्पष्ट केले.

बहुतांशी मुले इंग्रजी माध्यमांत शिकतात आणि त्यांना मराठी भाषाही शिकविली जाते. मात्र, घरात त्यांच्याशी बोलताना इंग्रजी मिश्रित मराठीत बोलले जाते. त्यामुळे धड ना इंग्रजी, ना मराठी अशा संभ्रमात त्या मुलाचा भाषा विकास होत नाही अशी खंत व्यक्त करीत मुलाच्या भाषिक जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने पालकांनी सजग रहावे, असे चाळके म्हणाले.

मराठी शुध्द लेखनाचे १८ शासकीय नियम दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत अविष्कृत करताना वैभव चाळके यांनी मराठी भाषेच्या ऐश्वर्य संपन्न नजाकतीचे दर्शन घडविले. ऱ्हस्व किंवा दीर्घ वेलांटी तसेच ऊकार याबाबत बहुतांशी लोकांमध्ये संभ्रम असून त्या दृष्टीने महत्वाचे तीन नियम त्यांनी सांगितले.

शुध्द लेखनामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली भाषा अचूक पोहोचते असे सांगत भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रशंसा केली. दरम्यान, समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी आपल्या दररोजच्या कामकाजात नस्तीची टिपणी तसेच पत्रलेखन यामध्ये मराठी शुध्दलेखन महत्वाचे असून त्यादृष्टीने सदर विशेष उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या भूखंडांवरील इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर