हल्लेखोरांना अटक न केल्यास  बेमुदत काम बंद आंदोलन करणार

नवी मुंबई:  पैशाच्या देवाण  घेवाणीतुन वाशी एपीएमसी फळ मार्केट मधील व्यापाऱ्याला शुक्रवारी मारहाण झाली होती. मात्र सदर आरोपींना अजून अटक केली नसल्याने येथील व्यापाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन करून या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तर येत्या शनिवार पर्यंत या आरोपींना अटक न केल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा फळ व्यापाऱ्यांनी दिला आहे.

शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास एपीएमसीतील फळ मार्केट मधील प्रमोद पाटे या व्यापाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. सदर हल्ला हा पैशाच्या देवाण घेवाणीतुन करण्यात आला होता. मात्र सदर हल्ल्याचा सूत्रधार हा येथीलच एक व्यापारी असून  व्यवसायाने तो विकासक आहे.त्याच्या मुलाने आपल्या १० ते १२ साथीदारांसह पाटे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तसेच  पाटे यांचा छातीवर पाय ठेवून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ कॉल पाटे यांच्या मुलाला केला होता. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून देखील पोलिसांनी अजून आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे या आरोपींना अटक करावी म्हणून एपीएमसी फळ मार्केट मधील व्यापाऱ्यांनी सोमवारी एक दिवसीय काम बंद करून या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तर एपीएमसी फळ मार्केट मध्ये काही लोकांची गुंडगिरी वाढत चालली असून याचा व्यापारी वर्गाला मोठा त्रास होत आहे. त्यामुळे पाटे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना येत्या शनिवार पर्यंत जर पोलिसांनी अटक नाही केली तर पुढील  सोमवार पासून एपीएमसी फळ मार्केट मध्ये बेमुदत काम बंद आंदोलन पुकरण्यात येईल असा इशारा फळ मार्केटचे संचालक व व्यापारी संजय पानसरे यांनी यावेळी दिला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छता कार्यात नागरीक सहभागावर भर