शिरवणे गावातील अंगणवाडी इमारत धोकादायक
नवी मुंबई ः शिरवणे गावातील अंगणवाडीची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सदरची धोकादायक इमारत पाडण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल'चे अध्यक्ष संतोष सुतार यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिरवणे गावातील पूर्वी ज्या ठिकाणी ग्रामपंचायत होती, त्या ठिकाणी महापालिका मार्फत जुनी इमारत पाडून तेेथे अंगणवाडी बांधण्यात आली आहे. आज अंगणवाडीच्या सदर इमारतीला किमान १५ ते २० वर्षे झाली असून सद्यस्थितीत अंगणवाडीची इमारत धोकादायक बनली आहे. नुकतीच ऑगस्ट महिन्यात महापालिकेचे नेरुळ विभाग कार्यकारी अभियंता चवडे यांनी अंगणवाडी इमारतीची पाहणी करुन सदर इमारत धोकादायक घोषित केली. तसेच सदर ठिकाणी नवीन इमारत बांधण्याबाबत त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले होते. दुसरीकडे वर्ष परंपरेनुसार येथील हनुमान मंदिरामध्ये २४ जानेवारी २०२३ रोजी वारकरी सांप्रदायाचा हरिनाम सप्ताह होणार आहे. या किर्तन सोहळ्यास दररोज किमान ४०० ते ५०० भवत येत असतात. त्यामुळे या हरिनाम सप्ताहाआधी किमान १५ जानेवारी पर्यंत अंगणवाडीची धोकादायक इमारत पाडण्यात यावी, अशी मागणी संतोष सुतार यांनी महापालिका आयुवतांकडे केली आहे.
तसेच दिलेल्या मुदतीत सदरची धोकादायक इमारत पाडून जागा मोकळी न केल्यास हनुमान मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहवेळी काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही संतोष सुतार यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.