एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ
नवी मुंबई ः ‘गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एसएससी बोर्डाच्या धतार्ीवरील एसएससी सराव परीक्षेचा नेरुळ येथील तेरणा कॉलेजमध्ये ३ डिसेंबर रोजी शुभारंभ झाला. याप्रसंगी आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह ‘ट्रस्ट'चे अध्यक्ष संजीव नाईक, सचिव माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आदि उपस्थित होते.
१९९८ साली सराव परीक्षा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भिती नाहीशी करुन मुख्य
परीक्षेला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि उत्तम यश संपादित करावे, असा उद्देश होता. तो उद्देश आज सफल झाला असून आजपर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती आमदार नाईक त्यांनी दिली. दहावीनंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी एसएससी सराव परीक्षा उपक्रमाचे कौतुक करीत या परीक्षेच्या माध्यमातून ‘गणेश नाईक ट्रस्ट'च्या वतीने विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षा देण्याचा सराव मिळतो. तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते, असे मत मांडले. एसएससी परीक्षा आयुष्यातील महत्त्वाचं वळण आहे. या परीक्षा विषयी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भिती असते. ती नाहीशी झाल्यास मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थी चांगली कामगिरी करु शकतात. विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा पुरेपूर वापर करुन यश संपादित करावे, असे आवाहन आयुवत नार्वेकर यांनी यावेळी केले. ‘ट्रस्ट'चे सचिव संदीप नाईक यांनी आपल्या प्रस्तावनेत आ. गणेश नाईक यांच्या प्रेरणेने एसएससी सराव परीक्षेचा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. ९०० विद्यार्थी आणि दोन परीक्षा केंद्र यापासून सुरू झालेली एसएससी सराव परीक्षेला आज भव्य आणि व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी ३ ते १८ डिसेंबर या कालावधीमध्ये २८ केंद्रांवर सराव परीक्षा होत आहे. १५ जानेवारीपर्यंत अचूक निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे. यावर्षी तब्बल ७२ शाळांचा समावेश आहे. मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन माध्यमातून सर्व विषयांसाठी घेतली जाणारी सराव परीक्षा महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा आहे. ४०० तज्ञ शिक्षकांचा संच परीक्षा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतो. परीक्षा केंद्रे हॉल तिकीट वाटप, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका तपासणे, मॉडरेशन करणे अशा सर्व बाबींचा अनुभव बोर्डाच्या धर्तीवर या सराव परीक्षेमध्ये मिळत असतो. विद्यार्थ्यांच्या गुणांचा स्कोर वाढविणारे स्पीड रिविजन ॲपचे विनामूल्य वितरण यावर्षी देखील ‘ट्रस्ट'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात, वेळेचे नियोजन कसे करावे, करिअर मार्गदर्शन अशी उपयुक्त माहिती आहे.
ज्येष्ठ शिक्षक समाधान जाधव यांनी एसएससी सराव परीक्षा विषयी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार नाईक यांनी या सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अनमोल उपक्रम सुरू केल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले.