काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'च्या मागणीला अखेर यश
नेरुळ सेक्टर-१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प बसवण्याच्या कामाला गती
वाशी ः नेरुळ सेक्टर-१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाने चौक आहे. मात्र, या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प नाही. त्यामुळे या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प बसवावे अशी मागणी काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे तत्कालीन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली होती. अखेर त्या मागणीला यश आले असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पुतळा बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
एकविसाव्या शतकातील शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख आहे. त्यामुळे आगामी पिढीला इतिहासाची महिती अधिक मिळू शकेल, यासाठी आधुनिक शहराला ऐतिहासिक वारसा देखील लाभला पाहिजे, याच उद्देशाने नवी मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिल्प, पुतळे बसविण्याची गरज आहे.
नेरुळ सेक्टर-१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चौक आहे. मात्र, या चौकात महाराजांचा ना पुतळा ना कुठली तसवीर. त्यामुळे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प बसवावे, अशी मागणी ‘काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'चे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी सातत्याने लावून धरली होती. त्या मागणीला यश आले असून, शिल्प पूर्व काम म्हणून मेघ डंबरी कमान, मावळे उभारणी, तटबंदी उभारणी, चौक सुशोभीकरण आदी कामांना महापालिका तर्फे सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच नेरुळ सेक्टर-१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प स्थापित केले जाणार आहे.