एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधासाठी विभागवार मोहीम

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधासाठी विभागवार विशेष मोहिमा

नवी मुंबई ः स्वच्छता विषयक कामांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला घातक असणाऱ्या प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापर होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक विरोधातील मोहिमा तीव्र करण्यात आल्या. तसेच ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी व्यावसायिक आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे बाजाराची ठिकाणे येथे जनजागृती करताना प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून वापरावयाच्या कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले.


१ डिसेंबर पासून महापालिकेच्या८ विभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी पथकांमार्फत केलेल्या कारवाईत २४ व्यावसायिकांकडून १ लाख २० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम तसेच १५९५.३० किलो इतके प्रतिबंधात्मक पिशव्या आणि प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये बेलापूर विभागात २  व्यावसायिकांकडून १० हजार रुपये दंड आणि १० किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. अशाच प्रकारे नेरुळ विभागात २ व्यावसायिकांकडून १० हजार रुपये दंडासह १.३० किलो प्लास्टिक साठा, वाशी विभागात २ व्यावसायिकांकडून १०हजार रुपये दंड आणि  २ किलो प्लास्टिक साठा, तुर्भे विभागात ५ व्यावसायिकांकडून २५ हजार रुपये दंड आणि १५५० किलो प्लास्टिक साठा, कोपरखैरणे मध्ये एका व्यावसायिकाकडून ५ हजार रुपये दंड आणि १ किलो प्लास्टिक साठा, घणसोली विभागात एका व्यावसायिकाकडून ५ हजार रुपये दंडासह १० किलो प्लास्टिक साठा, ऐरोली मध्ये ९ व्यावसायिकांकडून ४५ हजार रुपये दंडासह ११ किलो प्लास्टिक आणि दिघा विभागात २ व्यावसायिकांकडून १० हजार दंड आणि १० किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.


याशिवाय परिमंडळनिहाय नेमलेल्या २ भरारी पथकांकडून ८ व्यावसायिकांकडून ४५ हजार रुपये इतका दंड तसेच ४६३.८० किलो इतका प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे १ डिसेंबर पासून ३१ व्यावसायिकांवर पहिला गुन्हा असल्याने ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम तसेच तुर्भे विभागातील एका व्यावसायिकाकडून दुसरा गुन्हा असल्याने १० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण १ लाख ६५ हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम तसेच २०५९.१० किलो इतक्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

दैनंदिन जीवनातून प्लास्टिकला हद्दपार करणे पर्यावरणशील भविष्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन विविध माध्यमांतून नागरिकांना करण्यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिक शोध मोहिमा राबवून प्लास्टिक वापर आढळल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या आणि निसर्गाच्या भल्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूमीपुत्राचे प्रश्न अधिवेशनात मांडून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून उलवे मधील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन