प्रदूषणकारी ६५ कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे कारवाई

२ रासायनिक कारखाने बंद करण्याचे आदेश

वाशी : नवी मुंबई शहरात औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जानेवारी २०२३ ते ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात पूर्व दिशेला मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमधून रासायनिक द्रव्य तसेच वायू सोडण्यात येत असल्याने वाशी, कोपरी, खैरणे, घणसोली आदी भागात रोजच वायू प्रदूषण होऊन दर्प वास येत असतो. याविरोधात स्थानिकांनी वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत औद्योगिक वसाहतीत संयुक्त पाहणी दौरा केला. त्यात कारखान्यांसोबतच येथील नागरी वस्त्यांमधून देखील सांडपाण्याद्वारे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर तात्काळ लघुकालिन, मध्यावधी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सूचना गेल्या मार्च महिन्यात देण्यात आली होती. मात्र, सदर  सूचना देऊन देखील येथील कारखानदारांनी प्रदूषणाचे सत्र कायम ठेवले आहे. त्यामुळे वायू आणि जल प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून जानेवारी २०२३ ते ३० ऑगस्ट पर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे नवी मुंबई उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी दिली.

प्रदूषणकारी ६५ कारखान्यांवरील कारवाईचे स्वरुप
नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वायू तसेच जल प्रदूषण वाढत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम पाहता प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरुध्द १८ जणांना कारणे  दाखवा नोटीस, ३१जणांना प्रस्तावित निर्देश, १४ जणांना अंतरिम निर्देश आणि २ कारखाने बंद करण्याचे आदेश ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ' तर्फे देण्यात आले आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे मधील पदपथांची दुरवस्था; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष