कोकण विभागीय कार्यालय येथे कांदळवन संदर्भातील विविध विषयांवर बैठक संपन्न

कांदळवन संरक्षण-संवर्धनासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा -डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई : कांदळवन संरक्षण-संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत.

कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कांदळवन संरक्षण-संवर्धनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीस अप्पर प्रधान वनसंरक्षक (कांदळवन) एस. व्ही. रामराव उपस्थित होते.

कांदळवन संरक्षण-संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा, संस्था, अधिकारी यांनी योग्य समन्वय ठेवून तत्परतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना आयुवत डॉ. कल्याणकर यांनी दिल्या. कांदळवनाच्या बाधित क्षेत्रावर तज्ञांच्या सल्ल्याने पुनःस्थापना करणे, तसेच या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह एक स्वतंत्र जिल्हास्तरीय व्यवस्थापन कक्ष तयार करणे, त्याचबरोबर भारतीय वन अधिनियम १९२७, वन (संवर्धन) अधिनियम १९८० आणि पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ चा भंग होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही बैठकीत सूचित करण्यात आले.

यावेळी रामराव यांनी उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबतच्या मासिक बैठकीच्या आढाव्याचे इतिवृत्त कोकण विभागीय आयुक्तांच्या संकेतस्थळावर नियमित प्रसिध्द करणे, राज्यातील संवेदनशील कांदळवन क्षेत्र निश्चित करुन या क्षेत्रावर पोलीस यंत्रणा, वनसंरक्षक, ‘महाराष्ट्र सुरक्षा मंडळ'चे सुरक्षा रक्षक यांच्या मार्फत निगराणी ठेवणे, कांदळवन क्षेत्रात वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी उपाययोजना करणे, या क्षेत्रात सीसीटिव्ही बसविणे, कांदळवन क्षेत्रावर उपग्रहाद्वारे निगराणी ठेवून काही बदल निदर्शनास आल्यास ‘समिती'ने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. सदर कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, अशा सूचना रामराव यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, कांदळवन संदर्भातील विविध विषयांवर सदर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेंट मेरी विद्यालयात आग