साथीचे आजार, डेंग्यू, मलेरिया आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

आजारांचा प्रसार न होण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणेने दक्ष राहण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे : पावसाळ्यामध्ये विविध साथीचे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. साथीचे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया आजार उदभवू नये आणि उदभवल्यास त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे. सद्यस्थितीत ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात डेंग्यू, मलेरिया या आजारांच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी महापालिकेची प्रसुतीगृहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे देखील तातडीने या चाचण्या सुरू कराव्यात. तसेच विविध साथीच्या आजारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणत्याही तपासणीसाठी बाहेर जावे लागणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी २८ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभागाला दिले.

मागील काही दिवसात महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यूचे ७ तर मलेरियाचे ३५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी काही रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून, काहींवर उपचार सुरु असल्याचे आरोग्‌य विभागाकडून बैठकीत सांगण्यात आले.

पावसाळ्यात दरवर्षीच साथीचे आजार पसरत असतात. साथीच्या आजारांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. विविध साथीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते. या रुग्णांचे योग्य निदान करुन त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ‘आपला दवाखाना' येथे असलेल्या ए.एन.एम., जी.एन.एम यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात, यामध्ये कर्मचारी अपुरा पडत असल्यास अधिकचे कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावे आणि यासाठी आवश्यक असलेले चाचण्यांचे किटस्‌ उपलब्ध करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले.

गंभीर आजार असलेल्या डेंग्यू आणि मलेरिया या आजारांकडे दुर्लक्ष न करता जर एखाद्या व्यक्तीला या आजारांची लक्षणे आढळली तर त्या रुग्णाला चाचणी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला द्यावा, अशा सूचना ठाणे शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सना देत असतानाच संबंधित रुग्णांचे संपर्क क्रमांकही ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास द्यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यावेळी दिले. तसेच खाजगी डॉक्टरांकडून प्राप्त होणाऱ्या क्रमांकावर रुग्णांशी संपर्क साधून त्यांना चाचण्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना सर्व नागरी आरोग्य केंद्रांना देण्यात याव्यात. तसेच डेंग्यू, मलेरिया या आजारांबाबत घ्यावयाच्या काळजीमध्ये काय करावे आणि काय करु नये अशी माहिती देणारे फलक सर्व नागरी आरोग्य केंद्रात दर्शनी भागात दिसतील अशा पध्दतीने लावण्याच्या सूचनाही या बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डेंग्यू, मलेरियांच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. तसेच डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांची कमतरता पडता कामा नये. रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचा आवश्यक साठा उपलब्ध करुन ठेवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर सदर रुग्णास प्लेटलेटची आवश्यकता असल्यास त्याचे नियोजन करावे तसेच रक्तदात्यांची यादीही तयार करावी. कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही तपासणीसाठी बाहेर पाठवू नये तसेच डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना जर प्लेटलेट देण्याची गरज पडली तर सदर प्लेटलेटची उपलब्धता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मार्फतच केली जाईल आणि कोणत्याही रुग्णास रुग्णालयाच्या बाहेरुन खाजगी माध्यमातून प्लेटलेटस आणण्यासाठी सांगितले जाणार नाही, असे सुनिश्चित करावे तसेच रुग्णालयातील आयसीयू कक्ष कमी पडणार नाही या दृष्टीने नियोजन करावे, अशा सक्त सूचना महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांना दिल्या.

एखादा रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळल्यास त्या भागात ए.एन.एम. आणि आशा वर्करच्या माध्यमातून सर्व्हे करुन नागरिकांची तपासणी करावी.  तसेच त्या परिसरातील घरांचा सर्व्हे करण्यात यावा. डासांच्या अळ्यांचे नमुने घेवून त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सजग राहून फायलेरिया विभागाशी समन्वय ठेवून परिसरात धूर आणि औषध फवारणी करुन घ्यावी. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात तयार होत असल्यामुळे पाण्याची साठवणूक होणार नाही, साठविलेले पाणी कपड्याच्या साहाय्याने झाकून ठेवावे तसेच दर सात दिवसांनी पाणी भरलेली भांडी रिकामी करुन कोरडा दिवस पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. विहीरी, बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा वापर केला जात असलेल्या विभागांमध्ये पाण्याची चाचणी करावी, ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबतची तपासणी करावी. जर पाणी पिण्यायोग्य नसेल त्या विभागात पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून व्यवस्था केली जाईल, असेही महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

सर्व हौसिंग सोसायट्यांमध्ये पत्रक काढून डेंग्यू, मलेरिया आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दलची जनजागृती करावी. इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सर्व्हे करुन जर डासांची उत्पत्ती आढळून आली तर संबंधित बांधकाम विकासकाला जास्तीत जास्त दंड आकारण्याचे निर्देश देतानाच स्थानिक वर्तमानपत्रे, स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशाही सूचना महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुवत-१ संदीप माळवी, उपायुवत उमेश बिरारी, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल आदी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन