महिनाभरापासून समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील दोष शोधण्याचे काम

 

घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात ‘महावितरण'ला यश

नवी मुंबई : १५ जून २०२३ रोजी घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल न्हावा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. सदर वीजपुरवठा २ फेज द्वारे चालू करण्यात आला होता. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा नसल्याने पाणी पुरवठा करणारी मोटर बंद असून समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील दोष शोधण्याचे काम महिना भरापासून सुरु होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व परिस्थितीवर मात करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘महावितरण'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

घारापुरी येथील दोन नादुरुस्त सिंगल कोर समुद्राखालील केबल मधील दोष न्हावाखाडी ते मोरा बंदर दरम्यान समुद्राच्या आत असल्याने तसेच वादळी वाऱ्यासहीत प्रचंड मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती-ओहोटी आणि त्यामुळे उद्‌भवणारी अपरिहार्य परीस्थिती यावर मात करत सदरचे काम प्रगती पथावर चालू आहे. नादुरुस्त सिंगल कोर केबलमधील दोष शोधण्यासाठी ‘महावितरण'च्या पनवेल शहर विभागातील कर्मचारी मागील एक महिन्यापासून युध्दपातळीवर प्रयत्न करत होते. सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे आणि भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी व्यवतीशः लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी) सिंहाजीराव गायकवाड यांना विशेष सूचना दिल्या होत्या. मागील महिना भरापासून संततधार पावसात अविरत काम करुन घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे बेटावरील तिन्ही गावांच्या पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात आली आहे.

आपल्या जीवाची पर्वा न  करता  प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनी समुद्राखालचे दोष शोधून काम पूर्ण करत वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल घारापुरी बेटावरील तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी ‘महावितरण'चे आभार मानले आहे. सदर कामासाठी ‘महावितरण'चे पनवेल शहर कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर, सहाय्यक अभियंता रणजीत देशमुख तसेच विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघरचे शेतकरी करणार कोकण आयुक्तालय समोर बेमुदत उपोषण.