शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
शेती आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण
पनवेल : शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरु करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रुपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे. या केंद्राचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २७ जुलै रोजी राजस्थान येथे होणाऱ्या सोहळ्यातून करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी यांनी २६ जुलै रोजी पत्रकारांशी संवाद करताना दिली.
शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना माती, बियाणे आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध असलेल्या केंद्रांशी शेतकऱ्यांना जोडून देणे, शेतकऱ्यांना लागणाऱ्या अन्य सेवा विक्री पध्दतीने किंवा कस्टम हायरींग सेंटर द्वारे उपलब्ध करुन देणे. शेतकऱ्यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे, खते, औषधे, किटक नाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घ्ोणे, असे पंतप्रधान किसान समृध्दी केंद्रांचे उद्दिष्ट आहे, असे अविनाश कोळी यांनी नमूद केले.
देश भरात जिल्हा, तालुका आणि खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी २ लाख ८० हजार दुकाने आहेत. या खत विक्री दुकानांचे किसान सुविधा केंद्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने रुपांतर करण्यात येणार आहे. उत्तर रायगड क्षेत्रात असलेल्या पनवेल मध्ये १८, उरण मध्ये ४, खालापूर मध्ये ११ तर कर्जत तालुक्यात २४ अशी एकूण ५७ केंद्र आहेत, अशी माहिती अविनाश कोळी यांनी दिली.
शेतीमध्ये करता येवू शकणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झालेले नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, पिके, खते, शेतकऱ्यांच्या यशोगाथा याची माहितीही फिल्मद्वारे स्मार्ट टिव्हीतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान किसान समृध्दी केंद्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असणार आहे. या सर्व सुविधा स्थानिक भाषेत उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर किसान सुविधा केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्यांना परस्परांशी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ‘किसान की बात'च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सद्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रुपांतर पंतप्रधान किसान समृध्दी केंद्रांमध्ये करण्यात आले असून, उर्वरित १ लाख ८० हजार खत विक्री दुकानांचे रुपांतर या वर्ष अखेरीस किसान समृध्दी केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे, असे अविनाश कोळी यांनी सांगितले.