डाऊरनगर येथे घराजवळ दरड कोसळली


माळीण सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता; प्रशासनाने दखल घेण्याची गरज


उरण : गेल्या ३ ते ४ दिवसांपासून रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस पडत असून वादळवाराही मोठ्या प्रमाणात सुटत आहे. परिणामी नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. मात्र, सतत पडणारा पाऊस आणि वादळवारा यामुळे उरणमधील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी पर्वताचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सतत पडणारे पावसाचे पाणी यामुळे द्रोणागिरी डोंगर खचला असून, १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना घडली. दरड नागरिकांच्या घराजवळ कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, डाऊरनगर येथे माळीण किंवा इर्षाळवाडी सारखी दरड कोसळून घातपात होण्याची दाट शक्यता आहे. या घटनेमुळे डाऊरनगर परिसरातील १५ घरातील ३० ते ३५ नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन डाऊरनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन तिथे संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी डाऊरनगर ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, ‘चाणजे ग्रुप ग्रामपंचायत'चे सरपंच अमित भगत, उपसरपंच सोनाली ठाकूर यांनी सदर घटनेची पाहणी केली.


रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस, वादळवारा यामुळे रायगड जिल्ह्यातील काही डोंगर खचत चालले आहेत. तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडत आहे. माळीण दुर्घटना, त्यानंतर आता खालापूर तालुक्यातील इर्शाळगड दुर्घटना झाली. यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला. मात्र, इर्शाळगड येथील घटना प्रकारची घटना उरण मधील द्रोणागिरी पर्वतावरील डाऊरनगर भागात होणार असल्याने प्रशासनाने येथे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना समजताच उरण तहसील कार्यालयाची आपत्कालीन यंत्रणा लगेच तिथे दाखल झाली. तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी करुन आले आहेत. नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देखील दिलेल्या आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी दगड, माती काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जात आहेत. - उध्दव कदम, तहसीलदार - उरण तालुका.


डाऊरनगर येथे दरड कोसळल्याने लगेच कामगारांना बोलावून दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन माती, दगड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सतत सारखा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कामे करण्यात अडथळा येत आहे. जेसीबी लावून काम करता येत नाही. तसेच ऐन वेळी काम करण्यासाठी वेळेवर माणसे मिळत नाहीत.  ८ ते १० माणसे सदर ठिकाणी कामाला आहेत. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही अनुचित घटना, दुर्घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत तर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे. - अमित भगत, सरपंच - ग्रुप ग्रामपंचायत चाणजे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी