४ हजार २७७ खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई

‘वायुवेग' पथकांमार्फत १४ हजार १६१ खाजगी बसेसची तपासणी

नवी मुंबई : राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग' पथकांमार्फत १४ हजार १६१ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४ हजार २७७ खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत विविध परिवहन कार्यालयांमार्फत १ कोटी ८३ लक्ष रुपये तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणी दरम्यान रिपलेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त १७०२ बसेसवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या ८९० बसेसवर, योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या ५७० खाजगी बसेसवर, तर अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आलेल्या ५१४ बसेसवर कारवाई करण्यात आली.

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची आणि इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी १६ मे ते ३० जून २०२३ दरम्यान विशेष मोहिम राबविली. सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिपलेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.


विविध गुन्ह्यांसाठी कारवाई
मोटार वाहन कर न भरणाऱ्या ४८५ खाजगी बसेसवर, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या २९३ खाजगी बसेसवर, अवैधरित्या व्यवसायिक पध्दतीने माल वाहतुक करणाऱ्या २२७ खाजगी बसेसवर, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या १४७ खाजगी बसेसवर, वेग नियंत्रक नसणाऱ्या ७२ खाजगी बसेसवर, जादा भाडे आकारणी करणाऱ्या ४० खाजगी बसेसवर आणि इतर गुन्ह्यांमध्ये सुध्दा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहिम राबविण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहन चालकांच्या त्रासात आणखी भर