छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय मध्ये बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी

बायोमेट्रिकसाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी यांची नोंदणी प्रक्रिया सुरु

 ठाणे ः ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीसाठी नोंदणी सुरु आहे. येत्या १ ऑगस्ट पासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य होणार आहे. रुग्ण सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी उचलण्यात आलेल्या विविध उपायांपैकी बायोमेट्रिक हजेरी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय यांची कार्यक्षमता वाढवणे, रुग्णांना जलद सेवा मिळणे आणि रुग्ण सेवेचा दर्जा उन्नत करणे, यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विविध उपक्रम सुरु केले आहेत. सदर उपक्रमांचा भाग म्हणून दोन्ही ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरु केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा यांचा थेट संबंध आहे. डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहिले तर रुग्णसेवा सक्षम होण्यास फार मोठी मदत होते. रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी, विशेषतः वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा निर्णय महापालिकेने घ्ोतला आहे.

रुग्णांवरील उपचारासाठी अधिक मनुष्यबळ उभे करण्यासाठी भरती प्रकिया सुरु झाली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हजेरीचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी, तसेच कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून बायोमेट्रिक (फेस रीडिंग) हजेरी सुरू करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय या दोन्ही विभागातील सुमारे ८०० अधिकारी आणि कर्मचारी यांची बायोमेट्रिक हजेरी पध्दतीसाठी नोंदणी ११ जुलै पासून सुरु झाली आहे. पुढील सात दिवसात नोंदणीची प्रकिया पूर्ण होणार आहे. १८ जुलैपासून या प्रणालीची चाचणी सुरु होईल. तर, १ ऑगस्ट २०२३ पासून हजेरी पुस्तिकांची प्रक्रिया बंद होऊन पूर्ण हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने होईल. त्यासाठी दर्शनी भागात उपकरणे बसवली जात आहेत.

बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा प्रयोग महापालिका मुख्यालयात सुरु करण्यात आल्यापासून मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित होण्याच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याचप्रमाणे आता, रुग्णांसाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण वेळ उपलब्ध असावे, कामकाजाच्या वेळेत कर्मचारी त्यांच्या जागेवर हजर असावेत, यासाठी प्रशासकीय सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे, वेळेवर उपस्थित राहण्यास वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी प्रवृत्त होतील. रुग्णांना कुठेही तिष्ठत राहावे लागणार नाही. तसेच, रुग्ण सेवेचा दर्जाही उन्नत राहील, असे या संदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत गोदामांवर ‘नैना'ची कारवाई